अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी, पारधी समाजातील वंचितांच्या पालावर जाऊन उमंग फाऊंडेशनने दिवाळी साजरी केली. वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी फाऊंडेशनच
अहमदनगर (प्रतिनिधी)-
आदिवासी, पारधी समाजातील वंचितांच्या पालावर जाऊन उमंग फाऊंडेशनने दिवाळी साजरी केली. वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य नगर- दौंड महामार्गावर शास्त्रीनगर परिसरातील आदिवासी, पारधी समाज बांधवांच्या पालावर (झोपड्या) मदत घेऊन पोहचले. यावेळी गरजूंना फराळ, आकाश कंदील, पणत्या व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. दिवाळीला अचानकपणे मिळालेल्या भेटीने त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलले होते.
वंचितांची दिवाळी गोड करण्याच्या उपक्रमात उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, अॅड. पुष्पा जेजुरकर, गणेश कदम, सचिव वैशाली कुलकर्णी, सपना कासलीवाल, सुभाष जेजुरकर, उपाध्यक्ष संगीता गिर्हे, महेंद्र गिर्हे आदी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या संकटानंतर आदिवासी, पारधी समाजातील दुर्बल घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अनेकांच्या हाताला काम नाही, तर रोज पोट भरण्यापुरते कमविण्याचा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. या वंचितांची दिवाळी प्रकाशमय करुन त्यांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्यासाठी उमंग फाऊंडेशनच्या वतीन हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, दिवाळी आनंद साजरा करण्यापेक्षा आनंद वाटण्याचा सण असून, आपल्याच समाजातील दुर्बल घटकांची दिवाळी गोड करण्यात आली. मोठे व्यावसायिक व उद्योजक दिवाळीत पैसे कमविण्यात गुंतलेले असतात. मात्र सामाजिक जाणीव ठेऊन ही मदत करण्यात आली आहे. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रेरणेने फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS