Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

के. रामलू शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेत २५ विद्यार्थी पात्र; कुंडलवाडी परिसरातून कौतुकाचा वर्षाव
बंडखोरांना फूस कुणाची ?
डॉ.आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न : मंत्री छगन भुजबळ

नवीदिल्लीः तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत  यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. 

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.  कोरोना महामारीमुळे यंदा सर्व पुरस्कारांची घोषणा विलंबाने झाली. नुकतीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. आज प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना घोषित करताना मला अत्यानंद होत  आहे. रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेजगतावर अधिराज्य गाजवत असून लोकांचे निखळ मनोरंजन करत आहे.  त्याचमुळे ज्युरींनी त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखे पुजले  रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूरमध्ये एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला, की चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात. काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते; मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी  प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात  उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

……………….

चाैकट
जावडेकरांचा संताप

………………..

जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर उपस्थित पत्रकारांपैकी एकाने रजनीकांत यांना जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा संबंध जोडत प्रश्न विचारला. यावर जावडेकर यांनी संताप व्यक्त केला आणि योग्य प्रश्न विचारा, अशी विनंती केली. दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीशी निगडीत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कारासाठी नेमणूक केलेल्या पाच समीक्षकांनी एकत्रितपणे रजनीकांत यांच्या नावाचा निर्णय घेतला. यात राजकारण कुठून आले, असे स्पष्ट करत रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाविषयी चर्चा केली.

COMMENTS