शिवसेना नेमकी कुणाची ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिवसेना नेमकी कुणाची ?

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असतांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकत

प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !
निसर्गाचा नजारा
आतातरी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल का ?

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असतांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मात्र सत्ता येत असते, आणि जात असते, त्यात नवल नाही. मात्र एकनाथ शिंदे शिवसेनाच हायॅजॅक करायला निघाले असून, धनुष्यबाणावरच आपला हक्क सांगायला निघाले आहेत. त्यामुळे यानिमित्ताने काही प्रश्‍न उपस्थित होतात, त्याची उत्तरे भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील द्यावे लागणार आहे. राज्याचा प्रमुख असलेला व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री. तो ठरवेल, ती पूर्व दिशा असते. म्हणजेच त्याची प्रशासनावर कमांड असते, तसेच राज्यात काय घडत आहे, याती बित्तमंबातमी त्याच्यापर्यंत गुप्तचर विभागाकडून पोहचवली जाते. असे असतांना, एकनाथ शिंदे यांचे बंड उद्धव ठाकरेंना माहित नव्हते का. बरं एकनाथ शिंदे यांच्याकडे 33 आमदार पोहचल्यानंतर उद्धव ठाकरे बाकींच्या आमदारांनी नेत्यांची मनधरणी करून, त्यांचे मन का वळवू शकले नाही. हा ही यक्ष प्रश्‍न आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री आधी मातोश्री नंतर वर्षांवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपण मातोश्रीसोबत असल्याचा दावा केला आणि काही तासांतच गुवाहाटीला पोहचले. त्यामुळे सत्तांतरावर अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतांना दिसून येत आहे. राज्यामध्ये सुरु असणार्‍या सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राजकीय बंडासंदर्भातील माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाकडून मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणार्‍या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात अपयश आलं. याचसंदर्भात पवारांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँगे्रसने जशी नाराजी व्यक्त केली, तशी उद्धव ठाकरें यांनी केली नाही. उद्धव ठाकरे तर राज्याचे मुख्यमंत्री. सरकार जर धोक्यात असेल, तर त्याची बातमी सर्वांत अगोदर त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे होती. मात्र काही तास उलटल्यानंतर देखील याची खबरबात मुख्यमंत्र्यांना मिळत नसेल, तर या बंडात अनेक संशय निर्माण होतात. गाफील एकजण राहू शकतो, सर्वचजण नाही. त्यामुळे या बंडमागे कोण आहे, त्याचा चेहरा समोर येण्याची शक्यता धुसरच आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळचा शपथविधी उरकला. त्यानंतर राज्यात हायहोल्टेज ड्रामा रंगला. अजित पवार अनेक तास नॉट रिचेबल होते. नंतर मात्र ते आपल्याच नातेवाईकांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, माध्यमांना संबोधित करत, बंड माघार घेत, राजीनाम दिला. मात्र या हाय होल्टेज ड्रामासंदर्भात अजित पवारांनी जाहीर वक्तव्य केले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या रात्री काय घडामोडी घडल्या, यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. दोघांनीही चुप्पी साधत, मौन धारण करणेच पसंत केले. फडणवीस म्हणाले वेळ आल्यावर बोलू, पण अडीच वर्षांत ते यावर एकदाही बोलले नाही. त्यामुळे एकनाथ शिंद भाजपसोबत गेले, काय आणि नंतर पुन्हा शिवसेनेत आले काय, हे चित्र महाराष्ट्राला दिसेल. मात्र एकनाथ शिंदेमागे गॉडफादर कोण, इतके मोठे मंत्री, नेते सुरत, नंतर गुवाहाटीला जाण्यामागे नेेमका कुणाचा हात आहे, कोण त्यांना तिकडे पाठवत आहे, ही कारणे जनतेसमोर कधी येणार नाही, हे ही तितकेच खरे. वास्तविक पाहता आज सर्वंच नेत्यांना जनतेच्या प्रश्‍नांनी काही घेणे-देणे उरले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

COMMENTS