Homeताज्या बातम्यासंपादकीय

विषारी दारुचे बळी

बिहार राज्यात सध्या विषारी दारूमुळे मृत्यूतांडव सुरू असून, ते काही संपण्याची चिन्हे नाहीत. विशेष म्हणजे बिहार विधानसभेमध्ये देखील विषारी दारूमुळे

रशिया-युक्रेन युद्धाची वर्षपूर्ती
काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

बिहार राज्यात सध्या विषारी दारूमुळे मृत्यूतांडव सुरू असून, ते काही संपण्याची चिन्हे नाहीत. विशेष म्हणजे बिहार विधानसभेमध्ये देखील विषारी दारूमुळे विरोधकांनी नितीशकुमार यांना चांगलेच घेरल्याचे चित्र दिसून आले. मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करण्याऐवजी नितीशकुमार यांचे आकंडतांडव दिसून आले. बिहारमध्ये विषारी दारूमुळे गेल्या काही दिवसांत तब्बल 80 पेक्षा अधिक जणांचे बळी गेल्याचे समोर आले आहे. गावठी दारु म्हणजे,  दारुच्या नावाखाली तयार केलेले एखादे रसायनच प्यायला दिले जाते. ज्यावर कोणतीही शास्त्रशुद्ध प्रक्रिया केली जात नाही. शिवाय बिहारमध्ये दारूबंदी असल्यामुळे अनेक जण चोरुन दारुचा विक्री करत असल्याचे वास्तव्य बिहारमध्ये दिसून येते. त्याचमुळे आर्थिक लाभासाठी माणसाचा जीवही घेण्यास तयार असलेल्या राक्षसी प्रवृत्ती आणि त्यांची प्रशासनाची असलेली जवळीकही समोर येत असतांना, सरकार म्हणून नितीशकुमार याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू विकण्याचे प्रकार अनेक वेळेस बिहार राज्यात घडतांना दिसून येत आहे. ज्याप्रमाणे बंदी असलेल्या अनेक बाबी जशा राजरोस सुरू असतात तशाच पद्धतीने हातभट्टीच्या दारूचा हा व्यवहारही नियमित सुरू असल्याचे चित्र बिहारमध्ये दिसून येते. त्यातच विकासकामांचा वेग नसल्यामुळे दारिद्रय वाढतांना दिसून येत आहे. त्या बकालपणात अनेकानेक अनैतिक गोष्टींची भर होत होती. त्यात या बेकायदेशीर दारूचा धंदा वाढीस लागला होता. तो एवढया मोठया प्रमाणावर आहे की त्याला खरोखर बेकायदेशीर म्हणावं का असा प्रश्‍न पडत होता. स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक समाजसेवकांच्या आशीर्वादाने या धंद्यात वाढ होत गेली. आणि त्यातून विषारी दारूचे मृत्यूतांडव दिसून येत आहे. बरं ही देशात दरवर्षी विषारी दारु पिऊन होणारी मृत्यूसंख्या काही कमी नाही. नुकतीच राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी जाहीर झाली आहे. या आकडेवारीनुसार देशात बनावट दारूमुळे गेल्या सहा वर्षांत सात हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  बिषारी दारुमुळे बिहारमध्ये मागील तीन ते चार दिवसांत 80 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे 2016 पासून बिहारमध्ये दारुबंदी सुरु आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, बनावट दारु पिल्यामुळे 2016 मध्ये 1,054 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2017 मध्ये 1,510, वर्ष 2018 मध्ये 1,365, वर्ष 2019 मध्ये 1,296 आणि वर्ष 2020 मध्ये 947 जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये देशभरात बनावट दारु पिल्यामुळे 782 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे सर्वाधिक  137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाबमध्ये 127 आणि मध्य प्रदेशमध्ये 108 जणांचा मृत्यू झाला आहे.   बनावट दारुमुळे होणार्‍या मृत्यूवरुन बहुजन समाज पार्टीच्या खासदाराने लोकसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. याला केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी उत्तर दिले होते. त्यांनी वर्ष 2016 पासून 2020 पर्यंतचे एनसीआरबीचे आकडे संसदेत सांगितले. बनावट दारुमुळे उत्तर प्रदेशमध्ये 425, राजस्थानमध्ये 330, झारखंडमध्ये 487, हिमाचल प्रदेशमध्ये 234, हरियाणामध्ये 489, गुजरातमध्ये 54, छत्तीसगढमध्ये 535, बिहारमध्ये 23, आंध्र प्रदेशमध्ये 293 आणि पश्‍चिम बंगालमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. नवी दिल्लीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2016 ते 2021 पर्यंत सहा वर्षांच्या कालावधीत बनावट अथवा विषारी दारुमुळे भारतात तब्बल 6,954 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी देशात दररोज तीन ते चार जणांचा बनावट दारुमुळे मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण आकडेवारी धक्कादायक आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात विषारी दारुवर प्रतिबंधक कायदा करण्याची आणि त्यावर कठोर शिक्षा करण्याची खरी गरज आहे. दहशतवादी कारवाया, विषारी दारू आणि अपघातामुळे होणार्‍या मृत्यूची तुलना करता, देशात आजमितीस अपघातानंतर सर्वाधिक मृत्यू हे विषारी दारुचे बघायला मिळू शकतात, यातून देशाचा विकास अधोरेखित होतो. त्यामुळे याला आळा घालण्याची गरज आहे. 

COMMENTS