औंध / वार्ताहर : औंध जिल्हा परिषद गटात मिळविलेला विजय हा धनशक्तीला माझ्या औंध गटाच्या जनशक्तीने नाकारल्याचे सिध्द झाले आहे. यापुढील काळात औंधसह

औंध / वार्ताहर : औंध जिल्हा परिषद गटात मिळविलेला विजय हा धनशक्तीला माझ्या औंध गटाच्या जनशक्तीने नाकारल्याचे सिध्द झाले आहे. यापुढील काळात औंधसह जिल्हा परिषद गटातील विकास कामांबरोबरच औंधसह 21 गावे शेती पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, अशी माहिती औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी राजकन्या चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख, शुभम शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापुढील काळात महिन्यातून दोनदा मंगळवारी व बुधवारी जनता दरबार भरविणारे आहोत. औंध जिल्हा परिषद गटातील जनतेच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी यापुढील काळात बांधील राहणार आहोत. मागील 27 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे. तोच कार्याचा वसा यापुढील काळात ही सुरू ठेवणार आहोत.
कुरोली गणाचे नवनिर्वाचित सदस्य मनोज देशमुख म्हणाले की, तरुणांना तसेच महिलांना बचतगटाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षे पूर्ण ताकद लावून मनीषा फडतरे, शुभम शिंदे यांना बरोबर घेऊन औंध जिल्हा परिषद हा आदर्श गट बनविणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जरी दुःखद निधन झाले असले तरी यापुढील काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पदाधिकारी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.
औंध पंचायत समिती गणाचे सदस्य शुभम शिंदे म्हणाले की, औंध जिल्हा परिषद गटातील जनतेने दाखवून दिले आहे की, औंध जिल्हा परिषद गट हा राणीसाहेब यांचा बालेकिल्ला आहे. औंध जिल्हा परिषद गटातील जनता मोठ्या ताकदीने राणीसाहेब यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

COMMENTS