नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात शिक्षक भरती, टीईटी, वन विभागाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ लक्षात आल्यानंतर तलाठी भरतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होता

नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात शिक्षक भरती, टीईटी, वन विभागाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ लक्षात आल्यानंतर तलाठी भरतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात गुरुवारपासून तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा देणार्या होतकरू उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार 17 ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या पाळीतील परीक्षा होती. याचवेळी नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवार गैरप्रकार करत असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूर येथील परीक्षा केंद्रावरूनही प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
COMMENTS