कर्जत : रस्ता सुरक्षेचा संदेश सर्जनशीलतेतून प्रभावीपणे पोहोचवत मिरजगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) येथील विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर घवघव

कर्जत : रस्ता सुरक्षेचा संदेश सर्जनशीलतेतून प्रभावीपणे पोहोचवत मिरजगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली) येथील विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित चित्रकला, निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषेत या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये इयत्ता सातवीतील रिया सुनील कांबळे हिने चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर इयत्ता आठवीतील अदिती अमोल राऊत हिने निबंध लेखन स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल येत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या यशस्वी विद्यार्थिनींना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगळ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर चालताना व वाहन चालविताना पाळावयाच्या नियमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व याबाबतही त्यांनी जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांनी ही माहिती आपल्या पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब डहाळे, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शबाना तांबोळी, गांगर्डे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर यांचे आभार मानण्यात आले. मिरजगावच्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, रस्ता सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेशही प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.

COMMENTS