मुंबई/प्रतिनिधी ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने गुरूवारी आपले पतधोरण जाहीर केले असून, या पतधोरणात कर्जदारांना दिलासा देत रेपो रेट जैसे थ

मुंबई/प्रतिनिधी ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने गुरूवारी आपले पतधोरण जाहीर केले असून, या पतधोरणात कर्जदारांना दिलासा देत रेपो रेट जैसे थै ठेवण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी दिली. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कर्जदारांना ईएमआय वाढत होता, मात्र फेबु्रवारी 2023 पासून आरबीआयने आपला रेपो रेट जैसे थै ठेवल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
आरबीआयने आपले ऑगस्ट 2023 चे आर्थिक धोरण गुरुवारी जाहीर केले. आरबीआयने रेपो दरातील वाढ पॉज मोडमध्ये ठेवणे अपेक्षित होते. परंतु, या पतधोरणात जाहीर झालेल्या निर्णयानुसार व्याजदार कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय बँकेने यावर्षी फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच तो 6.5 टक्के वर स्थिर ठेवला आहे. चलनविषयक धोरण समितीने रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता. आज पुन्हा एकदा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सध्या रेपो दर 6.5 टक्केच राहील. 6 सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, त्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमधील रेपो दरातील या बदलासह मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरात 250 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 2.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा तिमाहीत रेपो दरात झालेल्या वाढीमुळे गृहकर्ज घेणारे प्रचंड नाराज आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केली होती. आता महागाई उच्च पातळीवरून खाली आली आहे. परंतु ती 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आगामी धोरणात रेपो दर कमी होण्याची शक्यता – रेपो रेट जैसे थै ठेवल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला असला तरी, यामुळे महागाई आटोक्यात येण्याची शक्यता नाही. महागाई रोखण्यासाठी रेपो रेट कमी करण्याची मागणी होत आहे.गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज वाढवला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये रेपो दर कमी होण्याची आशा नाही. या वर्षाच्या अखेरीस रिटेल चलनवाढीचा दर आरबीआयच्या उद्दिष्टापर्यंत आला तर केंद्रीय बँक पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपूर्वी रेपो दर कमी करणार नाही. याचा अर्थ तोपर्यंत तुमचा ईएमआय सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
COMMENTS