Homeताज्या बातम्यासंपादकीय

ऑक्टोबर हिट आणि जागतिक तापमान! 

सध्या आपण उन्हाळा वाटावा असा ऑक्टोबर हिट सर्वजण अनुभवतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराचे तापमान काही डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. मात्र आता

जातीनिहाय जनगणनेला पर्याय नाहींच !
मूक समाजाच्या दिशेने ? 
इंधन दरवाढ कपातीचे गौडबंगाल !

सध्या आपण उन्हाळा वाटावा असा ऑक्टोबर हिट सर्वजण अनुभवतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराचे तापमान काही डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. मात्र आता ग्लोबल वॉर्मिंग सारख्या, जे जगाला उन्हाच्या तडाख्यात नेणाऱ्या काही बाबी या किती धोकादायक आहेत ही बाब, जागतिक शास्त्रज्ञांनी आता पुढे आणली आहे. शास्त्रज्ञांच्या मते २१०० शतकापर्यंत जगाचे तापमान हे २.७ डिग्री सेल्सिअसने वाढणार असून यामुळे जगातील २२ टक्के लोकसंख्या ही नष्ट होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. साधारणतः दर पाच व्यक्तींमधील एक व्यक्ती, केवळ उन्हाचा तडाखा किंवा उष्माघात किंवा उन्हापासून निर्माण होणारे आजार किंवा गुंतागुंत यामुळे जीव गमावणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जागतिक ग्लोबल वार्मिंग मुळे वाढणाऱ्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम नायजेरिया नंतर भारतालाच भोगावा लागेल असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अर्थात यात इंडोनेशियाचे नाव देखील जोडले गेले आहे. वाढलेला उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीची उत्पादकता ही कमी होईल आणि त्याचबरोबर या उन्हाचा फटका हा साधारणता गरीब वर्गाला मोठ्या प्रमाणात बसणार असल्यामुळे मजुरांची संख्या देखील तेवढ्याच प्रमाणात वाढणार असा अंदाज ही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. परंतु शास्त्रज्ञ केवळ असा अंदाज व्यक्त करून लोकांमध्ये भीती निर्माण करून थांबत नाही तर त्यांनी काही आशावाद निर्माण केला आहे आणि तो त्यांनी सांगितला आहे. त्यांच्या मते जगाचे तापमान २.७ ऐवजी किंवा दोन डिग्री सेल्सिअस ऐवजी जर दीड डिग्री सेल्सिअसच्या आतच जर वाढ रोखण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला तर, जागतिक लोकसंख्येमध्ये जी २२ टक्के घट होणार आहे, तिचे प्रमाण फक्त पाच टक्क्यावर येऊन ठेपेल. अर्थात, हे सगळं माणसांच्या हाती आहे. यासाठी ते २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ग्लोबंग वॉर्मिंग परिषदेच्या ठरावानुसार, प्रत्येक देशाच्या सरकारने अंमलबजावणी केली तर निश्चितपणे ग्लोबल वार्मिंग च्या काळात वाढणारे तापमान हे काही प्रमाणात नियंत्रणात आणता येऊ शकते. पॅरिस मध्ये झालेल्या ग्लोबल वार्मिंग परिषदेत प्रत्येक देशाने पृथ्वीच्या ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनाच्या प्रक्रियेत कमी आणून, त्यासाठी प्रयत्न करावा असा करार झाला आहे. त्या प्रयत्नानुसार जर खरोखर जग कामाला लागले किंवा लागले असते तर निश्चितपणे दोन डिग्री एस सेल्सिअसच्या आत तापमान रोखता येऊ शकते. परंतु, सध्याच्या पद्धतीने जगभरातली सरकार आणि त्यांचा जो कारभार चालला आहे, मानवी जगात ते पाहता सन २१०० पर्यंत जगाचे तापमान २.७ डिग्री सेल्सिअस एवढे वाढल्याशिवाय राहणार नाही. एवढे तापमान झाले तर जगाचे काय नुकसान होईल, हे शास्त्रज्ञांनी आधीच भाकीत करून ठेवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माणसाने म्हणजे प्रत्येक माणसाने पर्यावरणाविषयी आपला दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे, याचे भान आता येणे गरजेचे आहे. आपल्या भावी पिढीला आणि मानवी समूह हा सुखी जीवन व्यतीत करावा, या अनुषंगाने जगाच्या एकूणच पर्यावरणाच्या समस्यांकडे मानव समाजाने पाहिले पाहिजे. त्यामध्ये आपण एक घटक आहोत आणि आपली जबाबदारी पर्यावरण रक्षणासाठी नेमकी काय आहे, हे निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. भारतातील शास्त्रज्ञांनी दोन वर्षांपूर्वी एका स्वतंत्र अभ्यासात असा अंदाज वर्तवला होता १९७० ते २०१९ या कालावधीत उष्णतेच्या लाटांनी १,४१,००० लोकांपैकी सुमारे १७,३०० लोकांचा बळी घेतला होता. प्रत्येक ०.१ डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्याने मानवी जीव धोक्यात येतो. भारतात १९०१ ते २०१८ यादरम्यान ०.७ डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे. यावरून आपण काय काळजी घ्यायला हवी, हे प्रत्येकाने निश्चयपूर्वक ठरवण्याची वेळ आली आहे!

COMMENTS