’त्या’ रेती ट्रकच्या सुटकेने मांडवी परिसरात चर्चेला उधाण! किनवट । प्रतिनिधी मांडवी पोलीस आणि महसूल विभाग यांच्यातील समन्वयाअभावी अवैध रेती वाहतुकीवर ह
’त्या’ रेती ट्रकच्या सुटकेने मांडवी परिसरात चर्चेला उधाण!
किनवट । प्रतिनिधी
मांडवी पोलीस आणि महसूल विभाग यांच्यातील समन्वयाअभावी अवैध रेती वाहतुकीवर होणारी कारवाई केवळ औपचारिकता ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात मांडवी पोलिसांनी धाडसाने पकडलेला 12 टायरी रेतीचा ट्रक महसूल विभागाच्या ’क्लीन चिट’मुळे सुटल्याने प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या कारवाईवर महसूल विभागाने ठपका ठेवल्याची माहिती समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत प्राप्त माहीती आधारे वृत्त असे की, 5 नोव्हेंबर रोजी कनकीफाटा जवळ मांडवी पोलिसांनी ढड-01 णउ-8389 क्रमांकाचा 12 टायरी ट्रक संशयास्पद स्थितीत अडवला. या ट्रकची पाहणी केली असता त्यात लाल रेती आढळून आली. पोलीस तपासात खालील त्रुटी समोर आल्या होत्या: रॉयल्टीमधील तफावत: चालकाकडे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाची 5 ब्रास रेतीची रॉयल्टी होती, मात्र त्यावर चालकाची स्वाक्षरी नव्हती. मार्गाचे उल्लंघन: खरेदीदार किनवट येथील असतानाही वाहतूक परवान्यावर किनवटला जाण्याचा कोणताही अधिकृत मार्ग (रूट) नमूद नव्हता. वेळेचे उल्लंघन: रॉयल्टीवर नमूद केलेली वाहतुकीची वेळ संपलेली असतानाही हा ट्रक रस्त्यावर धावत होता. या गंभीर बाबी लक्षात घेऊन मांडवी पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी ट्रक पोलीस ठाण्यात लावून महसूल विभागाला पाचारण केले. थोडक्यात: पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध धाडसी पाऊल उचलले खरे, मात्र महसूल विभागाच्या ’मेहरबानी’मुळे संबंधित वाहन बिनबोभाट सुटले. दोन विभागांतील या विसंवादामुळे अवैध रेती माफियांना अभय मिळत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महसूल विभागाचा ’विचित्र’ निर्वाळा
पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर महसूल प्रशासनाच्या मंडळ पथकाने पाहणी केली. मात्र, या पथकाने सर्व कागदपत्रे वैध असल्याचा अहवाल दिल्याचे समजते. पोलिसांना ज्या त्रुटी आढळल्या, त्या महसूल विभागाला का दिसल्या नाहीत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मंडळ अधिकार्यांचा पंचनामा आणि पोलिसांनी केलेली प्राथमिक कारवाई यांचा मेळ न बसल्याने अखेर तो ट्रक विनासायास सोडून देण्यात आला.
प्रशासकीय शीतयुद्ध?
या प्रकरणामुळे पोलीस आणि महसूल विभाग यांच्यातील दरी स्पष्टपणे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनाकारण गाडी पकडल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाने पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, केवळ 5 ब्रास रेतीसाठी 12 टायरी ट्रकचा वापर आणि रॉयल्टीमधील त्रुटींकडे महसूल विभागाने डोळेझाक का केली? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

COMMENTS