नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गुरुवारी सहा उमेदवारांची घोषणा केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगड
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गुरुवारी सहा उमेदवारांची घोषणा केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगडमधून फुलो देवी नेताम यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या हे दोघेही राज्यसभेचे सदस्य असून पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
हरियाणातून करमवीर सिंह बौद्ध यांना उमेदवारी देण्यात आली असून हिमाचल प्रदेशातून अनुराग शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. अनुराग शर्मा हे कांगडा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष असून ते राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे निकटवर्तीय मानले जातात. तेलंगणातील दुसर्या जागेसाठी पक्षाने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विश्वासू समजले जाणारे वीम नरेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम पक्षाने काँग्रेसला एक राज्यसभा जागा दिली असून त्या जागेसाठी एम. क्रिस्टोफर तिलक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनेही दोन टप्प्यांत तेरा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. निवडणूक आयोगाने 18 फेब्रुवारी रोजी दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती. या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. सध्या रिक्त होणार्या जागांपैकी 12 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ताब्यात असून 25 जागांवर विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे. सर्वाधिक सात जागा महाराष्ट्रातील, सहा तामिळनाडूतील आणि पश्चिम बंगाल व बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, शरद पवार, रामदास आठवले, कनिमोळी, तिरुची शिवा तसेच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे.

COMMENTS