Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस; परंतु, दिल्लीतून ओबीसी नावही पुढे येऊ शकते !

आज २६ नोव्हेंबर. संविधान दिनीच महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेचे आज गठन होईल. महाराष्ट्राचे सरकार येत्या एक-दोन दिवसात स्थापन होईलच; सरकार स्थापन

बुलडाणा जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार : डॉ.राजेंद्र शिंगणे
रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी | LOK News24

आज २६ नोव्हेंबर. संविधान दिनीच महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेचे आज गठन होईल. महाराष्ट्राचे सरकार येत्या एक-दोन दिवसात स्थापन होईलच; सरकार स्थापन करत असताना, ज्यांच्या मेहनतीमुळे महायुतीला शक्तिशाली बहुमत मिळाले, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात सहमती होत आहे. निवडणुकांचा निकाल लागल्या लागत असतानाच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. याचं कारण लोकांच्या मनातील किंबहुना निवडून आलेल्या सदस्यांच्या मनातील ते मुख्यमंत्री आहेत, हे ठाम झाले होते. अर्थात, काल दोन्ही बाजूंनी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. खास करून देवेंद्र फडणवीस यांचे परिश्रम या निवडणुकीत अधिक असल्याने, त्यांच्या नावावर नवनिर्वाचित आमदारांची सहमती निश्चितपणे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील त्यांच्या नावाला अनुमती दर्शवली आहे. परंतु, त्यांची अनुमती ही एका बाजूने एक मुसद्दीपणाचा भागही असू शकतो; देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आलेच तर, महायुतीतील तिन्ही घटकांची त्यांस मान्यता असेल! गेली दोन दिवस देशाची राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण असावं, यासंदर्भात खलबत्त सुरू असली तरी, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जर दिल्लीने एखादे नवीन नाव सुचवले तर, ते निश्चितपणे महाराष्ट्रासाठी धक्कादायक असू शकते. अर्थात, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय खेळी या नेहमीच धक्कादायक राहिलेल्या आहेत.  आपल्या राजकीय समीकरणासाठी ते नेहमीच धक्कातंत्राचा वापर करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवीनच नाव आले तर, निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना मध्यप्रदेशच्या उदाहरणाप्रमाणेच म्हणजे शिवराजसिंह चव्हाण यांना जसे केंद्रात बोलवलं गेलं, तसं फडणवीस यांनाही केंद्रात बोलवण्याची शक्यता अधिक असू शकते; परंतु, महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांच्या मनातील खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांची ख्याती राहिलेली आहे, त्यांना सोपवलेली जबाबदारी ते अतिशय सचोटीने पार पाडत असतात. त्यामुळे, जर त्यांना महाराष्ट्रातून केंद्रात बोलवलं तर त्याही ठिकाणी ते आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे उमटवतील. कारण, त्यांची कार्य करण्याची पद्धत ही ऊर्जाशील आहे. संघटन कौशल्य ही त्यांच्या एकूण राजकारणात निश्चितपणे आहे. मुत्सद्दीपणा तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणातच आहे! त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाची तुलना नेहमीच महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्दीपणा बरोबर होत असते. त्यामुळे, राजकारणासाठी लागणारे मुरब्बीपण हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निश्चित आहे. गेली दोन दिवस दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा होत आहे, याचा अर्थ अन्य कोणतेही नाव येण्याची शक्यता मुख्यमंत्रीपदासाठी नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणामध्ये आणखी एक धक्का तंत्र मोदी-शहा वापरू शकतात आणि महाराष्ट्राला एका नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाशी परिचित करू शकतात. यामध्येही फार शंका असणार नाही. जर नवीन नाव दिल्लीवरून ठरले तर, त्यामध्ये ओबीसी नावाचा देखील विचार होऊ शकतो. कारण मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात भाजपाकडे झुकलेला आहे; हे सूत्र लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी नावाची चर्चाही होऊ शकते. राजकारणामध्ये सत्तापदासाठी ज्या नावांची चर्चा प्राधान्य क्रमाने होते, ती नावे अंतिम प्रक्रियेत मागे पडतात. ज्या नावांची चर्चा होत नाही, ती नावे अचानक समोर येतात. अर्थात, मोदी-शहा यांच्या धक्का तंत्रामध्ये अशा प्रकारचे निर्णय होतच असतात!

COMMENTS