नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात नावाच्या भोंदूगिराचे कारणामे आता पूर्णतः चव्हाट्यावर आले आहेत. देशभरात अशा भोंदू बाबांचे पीक आले आहे; जे राजकीय शक्त

नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात नावाच्या भोंदूगिराचे कारणामे आता पूर्णतः चव्हाट्यावर आले आहेत. देशभरात अशा भोंदू बाबांचे पीक आले आहे; जे राजकीय शक्तींच्या इच्छाशक्ती शिवाय कधीच बाहेर येत नाही. यासंदर्भात जे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये फिरत येत आहेत त्यातून हा खरात किती विकृत आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे या माणसाने आपल्या विकृतीचे चित्रीकरण केले आहे. म्हणजे या व्हिडिओंचा वापर त्याने ब्लॅकमेलिंगसाठी केला असण्याची दाट शक्यता आहे. याहून कहर म्हणजे सदर चित्रीकरण सुरू असताना पार्श्वभूमीवर आरती किंवा स्तोत्रासारखे काहीतरी ऐकू येत आहे. अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे वारंवार दिसून येते. परंतु जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले व्यक्तीच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. वर्षानुवर्षे विश्वासार्हतेचा आभास निर्माण करून, ज्योतिष व धार्मिक आडाख्यांच्या माध्यमातून उच्चभ्रू समाजात प्रवेश मिळवत, बंद दाराआड महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. सत्तेशी असलेली जवळीक आणि प्रभावामुळे अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास निर्माण होतो. भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या असताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा काही दोष नाही, रूपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील. महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात रूपाली चाकणकर यांची कुठलीही चूक नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एकूणच या घडामोडींना पाठिंबा आहे का, ते मात्र कळत नाही. अशोक खरात या भोंदूगिराचे प्रकरण चव्हाट्यावर येताच सर्वाधिक टार्गेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या झाल्या आहेत. अशोक खरात याचे राजकीय सत्तेशी असणारे लागेबांधे एव्हाना स्पष्ट झाले आहेत. खरात या भोंदू बाबाच्या दरबारात अनेक सत्तासीन लोकांचा वावर होता, असे निश्चित म्हणता येते. मात्र, रूपाली चाकणकर यांच्याभोवती हे प्रकरण अधिक लपेटले जाते आहे, असे एकंदरीत दिसतें. नुकतेच पुण्यात संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त रूपाली चाकणकर यांचे भाषण फारच गाजले होते. त्याची आम्ही दखल मधून विशेष नोंद घेतली होती. त्या भाषणात त्यांनी प्रचलित व्यवस्था आणि प्रवृत्तींवर प्रहार केला होता.सत्तेत राहून अशा प्रकारचे विचार मांडणे ही देखील एक प्रकारची बंडखोरी असते. प्रचलित व्यवस्थेत राहून सारे लाभ पदरात पाडून घ्यायचे आणि वरून बंडखोरी चा आव आणायचा असल्या दुटप्पी गोष्टी प्रचलित व्यवस्थेत खपवून घेतल्या जात नाहीत. याचा दुसरा अर्थ असा की, चाकणकरांना अडचणीत आणण्यासाठीच अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण चव्हाट्यावर आणण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडतात हे आश्चर्यकारक आहे. जे काही त्यांच्यावर आरोप झाले, ज्या माध्यमातून त्यांना अटक केली. निंदनीय असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. महिला आयोगाच्या प्रमुख त्यांच्या ट्रस्टच्या विश्वस्त आहेत, असे माझ्या कानावर आले. त्यांनी जर नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी लगेच राजीनामा घ्यावा. राजीनामा देत नसेल तर त्यांना बडतर्फ करावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्णय घ्यावा, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती असल्याचे त्यांनी म्हटले. एकंदरीत, अशोक खरात या भोंदूगिराविरूध्द कारवाई किती होईल, याविषयी साशंक असताना रुपालीताई चाकणकरांना मात्र, सरकार बाहेर पडावे लागेल अन्यथा त्यांना सरकारमधून काढले जाईल!


COMMENTS