शेतकर्यांच्या संघर्षानंतर अखेर प्रशासन लागले कामालाम्हसवड / वार्ताहर : तारळी सिंचन योजनेच्या अन्यायकारक पाणी वाटपाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश कर
शेतकर्यांच्या संघर्षानंतर अखेर प्रशासन लागले कामाला
म्हसवड / वार्ताहर : तारळी सिंचन योजनेच्या अन्यायकारक पाणी वाटपाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनानंतर केवळ 24 तासांतच आज सकाळी माण तालुक्याच्या पूर्व भागात शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षभरात तारळी योजनेचा थेंबभर पाणीही न पाहिलेल्या वळई, जांभूळणी, बनगरवाडी, शिरताव, देवापूर, पळसावडे या गावांना अखेर जीवनदायी पाणी मिळाले. नाक दाबल्यावर तोंड उघडते या म्हणीप्रमाणेच शेतकर्यांच्या तीव्र भूमिकेमुळे प्रशासनाला हलवावं लागलं, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
महेश करचे यांनी काल जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात, पाणी न मिळाल्यास 30 एप्रिल रोजी जनावरांसह अर्धनग्न आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने जलसिंचन विभागावर दबाव टाकत तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकर्यांच्या संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, ही खंतही व्यक्त होत आहे. कृतीशून्य आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात पाण्याचा एक थेंब अधिक मौल्यवान असतो, असा टोलाही शेतकर्यांनी प्रशासकीय यंत्रणेला लगावला आहे. या सकारात्मक घडामोडीने पाणी टंचाईत होरपळणार्या माण तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातही पाणी नियोजन न्याय्य पध्दतीने व्हावे, हीच शेतकर्यांची प्रमुख मागणी आहे.
COMMENTS