Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नौदल-राज्य शासनाची तांत्रिक समिती नियुक्त

पुतळा कोसळण्याची कारणे शोधणार ः मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे

कांदा प्रश्‍नावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई
धनगर आरक्षणाकडे सर्वाचेच दूर्लक्ष : बाळासाहेब दोडतले
भवरी देवी खून, सेक्स स्कँडल प्रकरणातील माजी मंत्र्याचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी वर्षा बंगल्यावर बैठक घेत शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती जबाबदारी निश्‍चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

कला संचालनालयाची केवळ 6 फुट पुतळ्याला परवानगी – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता राज्याच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ 6 फुटांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मग या किल्ल्यावरील पुतळ्याची उंची वाढली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS