नाशिक- कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणार्या महिलांच्या आरोग्याबाबत मात्र अनेकवेळा गंभीरता नसते. पण एखाद्या कुटुंबाचे आरोग्य चांगले र
![](https://lokmanthan.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA0077-650x432.jpg)
नाशिक– कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणार्या महिलांच्या आरोग्याबाबत मात्र अनेकवेळा गंभीरता नसते. पण एखाद्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे असे वाटत असेल, तर त्या घरातील महिलेचे आरोग्य आधी चांगले असणे आवश्यक आहे. यासंदर्भात समाजात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.राज नगरकर यांनी केले.
मुंबई नाका येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथील सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त स्व. चतुर्भुज बजरंगलाल चौधरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित धम्माल खेळ आणि भजनी मंडळांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, तुप्तिदा काटकर, जितेंद्र येवले संगीता वेढणे, पद्मिनी काळे उपस्थित होते.33 भजनी मंडळांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
डॉ.नगरकर म्हणाले, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा व स्तनांचा कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. दैनंदिनरित्या साध्या व सुलभ निरीक्षणांतून संभाव्य धोक्याचा अंदाज घेतांना प्राथमिक स्तरावर उपचारातून कर्करोगातून मुक्त होता येऊ शकते. तसेच नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जितेंद्र येवले यांनी केले. प्रास्ताविक तृप्तीदा काटकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा सत्कार रमेश डहाळे, देवराम सैंदाणे, रंजनभाई शाह यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी, साहित्यिक रविंद्र मालुंजकर यांनी केले.पद्मिनी काळे यांनी आभार मानले.
कृतज्ञतेची भावना कायम असावी ः पाटील – वेगवेगळ्या नात्यांतून, वेगवेगळ्या भूमिकांतून महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठबळ देत असतात. अगदी जन्मदात्या आईपासून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावणार्या प्रत्येक महिलेविषयी आपल्या मनात कायम कृतज्ञतेची भावना असायला हवी, असे मत महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, गृहिणी हा प्रत्येक घरातील कणा असते. तिची मेहनत दिसत नसली तरी त्याशिवाय घर उभे राहू शकत नाही. त्यामुळे महिलांचा यथोचित सन्मान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS