सुवेझ कालव्यातील वाहतूक सुरू; पण…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुवेझ कालव्यातील वाहतूक सुरू; पण…

सुवेझ कालव्यात अडकलेले जहाज काढण्यात आले असले, तरी गेल्या सात दिवसांत झालेले नुकसान पाहता आणि संभाव्य अपघात लक्षात घेता सुवेझ कालव्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच त्याला काही पर्याय आहेत का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन

मुंबई / प्रतिनिधीः सुवेझ कालव्यात अडकलेले जहाज काढण्यात आले असले, तरी गेल्या सात दिवसांत झालेले नुकसान पाहता आणि संभाव्य अपघात लक्षात घेता सुवेझ कालव्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच त्याला काही पर्याय आहेत का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. सुवेझ कालव्यात मंगळवारपासून अडकलेलं जहाज मोकळे करण्यात यश आले आहे. हे जहाज मोकळे करण्यासाठी लाखो टन वाळू उपसावी लागली. 

1300 फुट लांब असलेले जहाज सरळ करण्यात आले असून यामुळे आता सुवेझ कालव्यातील वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रगबोट्स आणि ड्रेजर्सच्या साहयाने या जहाजाला बाहेर काढण्यात आले. इजिप्तच्या भागात असलेला सुवेझ कालवा हा जागतिक व्यापारउदीमासाठी आत्यंतिक महत्त्वाचा मानला जातो. सुवेझ कालवा सागरी मालवाहतुकीचा कणा समजला आतो. सुवेझ कालव्यामुळे आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक शक्य झाली. जगभरातील व्यापाराच्या 12 टक्के मालाची सुवेझ कालव्यातून केली जाते.

मंगळवारी (23 मार्च) चीनहून नेदरलॅंडला जाणारे जपानी मालवाहू जहाज सुवेझ कालव्यात अडकले होते. जहाज अडकल्याने जगभरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला. सुवेझ कालवा बंद झाल्याने खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या. इजिप्तमध्ये असलेला सुवेझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा कालवा 193 किलोमीटर लांब आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील हा कालवा सर्वांत छोटी लिंक आहे. C SPORT

सुवेझ कालवा मालवाहतुकीसाठी 1869 मध्ये सुरू करण्यात आला. सुवेझ कालवा सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आणि पश्चिमेच्या देशातून ये-जा करणारी मालवाहतूक जहाजे दक्षिण अफ्रिकेच्या केप-ऑफ-गुड होपला वळसा घालून प्रवास करत. सुवेझ कालव्यामुळे आशिया आणि युरोपातील मालवाहू जहाजांचे अंतर साडेसात हजार किलोमीटरने कमी झाले.  गेल्या सात दिवसांपासून तिथे जहाज अडकल्याने काहींनी पुन्हा जुन्याच मार्गाने वाहतूक केली. त्यामुळे त्यांना प्रवासासाठी जादा वेळ आणि इंधनही लागले.  सुवेझ कालव्यात यापूर्वीही जहाजे अडकली होती; परंतु इतका काळ एखादे जहाज अडकण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला सुवेझ कालव्याला दुसरा चांगला पर्याय नाही, हे ही दिसले.  सुवेझ कालव्याची भौगोलिक परिस्थिती पहाता, याला ‘चोक पॉइंट’ म्हणून ओळखले जाते. एका अंदाजानुसार, सुवेझ कालव्यातून दरवर्षी 19 हजार जहाजातून 120 कोटी टन मालाची ने-आण केली जाते. सुवेझ कालव्यातून दररोज 9.5 अब्ज मूल्य असलेली जहाजं ये-जा करतात. जाणकारांच्या माहितीनुसार, सुवेझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सुवेझ कालवा पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याचे कारण, मध्यपूर्वेच्या देशातून युरोपात इंधन आणले जाते. 2015 मध्ये सुवेझ कालवा रुंद करण्यात आला असला, तरी त्यातून वाहतूक करणे फार आव्हात्मक असते. त्याचे कारण केवळ जहाजे कालवा अरुंद आहे, म्हणून अडकत नाहीत, तर वा-याच्या प्रचंड वेगामुळेही ती हेलकावतात आणि तिरकी होऊन कालव्यात अडकतात. त्यावर उपाय अजूनतरी निघालेला नाही.  

भारताचा दोनशे अब्ज डाॅलरचा व्यापार

सुएझ कालवा वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि इतर काही बंदरांवर मोठ्या प्रमाणावर जहाजे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य परिस्थितीची तयारी करण्याची सूचना या बंदरांच्या प्रशासनाला देण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले. या मार्गावरून भारताचा 200 अब्ज डॉलरचा व्यापार होत असतो.

COMMENTS