महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी टाळेबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी टाळेबंदी

कोरोनाच्या दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात
शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात : उपमुख्यमंत्री पवार
धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण

मुंबई / प्रतिनिधीः कोरोनाच्या दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ’’हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले; पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो’’, हा आपला अनुभव असल्याचे  सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण बघता, राज्यात कडक

टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या बैठकीत व्यक्त केले आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण टाळेबंदीची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही टाळेबंदी आठ-दहा दिवसांचा असू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यवासीयांशी संवाद साधला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, एक-दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. टाळेबंदी हा उपाय नाही; पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक टाळेबंदी लावावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी टाळेबंदी अटख असल्याचेच संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे यावर मी बोलणार नाही. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखही उपस्थित होते. या वेळी संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाहीत. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल 47 हजार 827 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद झाली आहे. एका दिवसात तब्बल 8832 नवीन रुग्ण वाढले आहेत, तर 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता 58 हजार 455 वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता 46 दिवसांवर आला आहे, तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता 1.46 टक्के आहे.

वेगवेगळी टाळेबंदी

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर टाळेबंदीसंदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. बीड, अमरावती, बुलडाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसून आल्याने आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS