सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे आयोजित शिवजयंती 2026 कार्यक्रमात बोलताना गंभीर आरो

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे आयोजित शिवजयंती 2026 कार्यक्रमात बोलताना गंभीर आरोप केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण ठामपणे भूमिका घेतल्यामुळे आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. काही जणांना आपल्या विरोधात उभे केले जात असून सुपार्या देण्यापर्यंत प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे सभास्थळी उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
जरांगे पुढे म्हणाले की, काही व्यक्तींकडून मुद्दाम आपल्याविरोधात वक्तव्ये करून घेतली जात आहेत. मात्र, मराठा समाज आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माचनूर व मंगळवेढा परिसरातील दौर्यादरम्यान त्यांचे मोठ्या संख्येने स्वागत करण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या या भेटीत मार्गभर समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेत बोलताना त्यांनी समाजाला व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. व्यसनांपासून दूर राहून शेतीकडे लक्ष द्या, कष्ट करा आणि संघटितपणे समाजाची ताकद वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. आरक्षणाची लढाई ही केवळ राजकीय मुद्दा नसून सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष असल्याचे ते म्हणाले. राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित ठेवावे आणि त्यानंतर आपल्या व्यवसाय-शेतीकडे लक्ष द्यावे, असा संदेश देताना त्यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. आपली मुलं उच्च शिक्षित होऊन अधिकारी बनली तर पुढील अनेक वर्षांची चिंता कमी होईल. स्वावलंबन वाढेल आणि कोणाकडेही सहीसाठी जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नसून सर्व पक्षांतील मराठा समाजाचा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी ही लढाई सर्वसमावेशक असल्याचे सांगितले. दरम्यान, सरकारने आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. याचवेळी त्यांनी सातारा गॅझेटिअरमधील ऐतिहासिक संदर्भांबाबतही भूमिका मांडण्याचा संकेत दिला. मराठा इतिहास आणि समाजाशी संबंधित नोंदींबाबत आवश्यक ते बदल किंवा स्पष्टीकरण व्हावे, यासाठी पुढील काळात लढा उभारणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

COMMENTS