संगमनेर: तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ - उतार सुरू असताना देखील रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित के

संगमनेर: तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ – उतार सुरू असताना देखील रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित केले. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यभरातील तमाशासह सर्व लोककलावंतांचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. यावेळी, संगमनेर ही माझी कर्मभूमी आहे,संगमनेर हे माझे आईबाप आहेत असे उद्गार लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी काढले.
कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे संगमनेर मधील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.रावसाहेब कसबे, मा.आ. डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय व संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी, रघुवीर खेडकर म्हणाले की, मला आजही वाटत नाही की हा पुरस्कार मला मिळाला आहे. महाराष्ट्रातील रसिकांचे प्रेम आणि संगमनेर करांचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संगमनेर ही माझी कर्मभूमी आहे आणि या संगमनेरचा मला कायम अभिमान आहे. वयाच्या नवव्या वर्षी रंगमंचावर आलो आणि तिथून सोंगाड्या झालो माझ्या बहिणीने साथ दिली. ही संगमनेरची भूमी आहे आज हा सोहळा पाहताना आई हवी होती असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, रघुवीर खेडकर यांचा पुरस्कार संगमनेर शहर आणि तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. तमाशा ही लोककला महाराष्ट्राची ओळख असून या पुरस्काराने तमाशा लोककलेचा गौरव झाला आहे. या पुरस्कारामुळे नवीन कलावंतांना प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS