केंद्राकडून अगोदर मदत आणि नंतर लूट ; शेतकर्‍यांच्या संतप्त भावना; रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राकडून अगोदर मदत आणि नंतर लूट ; शेतकर्‍यांच्या संतप्त भावना; रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ

किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.

छ.संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन : अजित जगताप
टीईटी घोटाळाप्रकरणी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत

बारामती/ प्रतिनिधीः किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकर्‍याच्या कंबरेचे सोडून त्याच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे. सरकारने आम्हाला मदतीची आशा दाखवून लुटण्याचा प्रकार केला असल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

    रासायनिक खतांच्या किंमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारकडे असते. सलग दुसर्‍या वर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी वर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. बागायती पट्ट्यातदेखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी शेतकर्‍याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. आता खतांच्या किंमती वााढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यातून एकदा दोन हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकर्‍यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.  केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात शेतीमालाच्या उत्पादनात दुप्पट वाढ करून, शेतीमालाच्या किंमती आणखी कमी करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

COMMENTS