पाटणा : बिहारमध्ये आता सरकारी नोकर्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे नितीश कुमार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बिहार विधानस
पाटणा : बिहारमध्ये आता सरकारी नोकर्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे नितीश कुमार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नितीश कुमार यांच्या निर्णयानुसार, आता बिहार राज्यातील मूळ रहिवासी महिलांना राज्यातील सर्व सरकारी सेवा, संवर्ग आणि सर्व स्तरांवरील पदांवरील भरतीमध्ये 35 टक्के आरक्षण लागू असणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने केलेल्या या घोषणेनंतर नितीश कुमार म्हणाले की, सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये सर्व श्रेणी तथा स्तरावरील सर्व प्रकारच्या पदांवर भरतीमध्ये बिहारमधील मूळ रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांसाठी 35 टक्के आरक्षण या पुढे देण्यात येईल.
तसेच सरकारी आणि सार्वजनिक विभागाच्या सेवांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये जास्तीत जास्त महिलांनी प्रशासनात महत्वाची भूमिका बजावावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी पाटणा येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये बिहार युवा आयोगाची स्थापना करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं की, मला तुम्हाला कळवताना आनंद होत आहे की बिहारमधील तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने बिहार युवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.


COMMENTS