नवी दिल्ली ः काँगे्रसची आर्थिक खाते काही महिन्यापूर्वीच प्राप्तीकर विभागाने गोठवल्यानंतर काँगे्रसने संताप व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी ख

नवी दिल्ली ः काँगे्रसची आर्थिक खाते काही महिन्यापूर्वीच प्राप्तीकर विभागाने गोठवल्यानंतर काँगे्रसने संताप व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी आमच्याजवळ दोन रूपये देखील नाहीत, अशी खंत काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी काँगे्रसला प्राप्तीकर विभागाने 1 हजार 823 कोटींचा कर भरण्याची नोटीस दिल्यानंतर काँगे्रसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कडवी झुंज देऊ नये, यासाठी त्यांना पंगू करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. भाजपकडून कर दहशतवाद केला जात असून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आर्थिक पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. तर भाजप कर कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप खजिनदार अजय माकन यांनी केला. आम्हाला जो नियम लावला जात आहे, तोच जर भाजपला लावला तर त्यांना 4 हजार 600 कोटींची नोटीस प्राप्तिकर विभागाने द्यायला हवी, असेही अजय माकन म्हणाले. प्राप्तिकर विभागाला काँग्रेसच्या चुका दिसत असतील तर भाजपच्या चुका का दिसत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केली. समोर आलेल्या माहितीनुसार 2017-18 आणि 2020-21 या वर्षांमध्ये प्राप्तिकर भरण्यात विसंगती दिसल्यामुळे काँग्रेसला सदर नोटीस बजाविण्यात आली. दुसरीकडे वर्ष 2014-2021 या काळात एकूण 523.87 कोटी रुपयांच्या बेहिशेबी व्यवहार प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून सदर नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले गेले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये 523.87 कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले होते, असेही सांगितले जात आहे.
प्राप्तिकर लवादाचाही काँग्रेसला धक्का – काँगे्रसची सर्वच बाजूने कोंडी होत असतांनाच, मार्च महिन्यात काँग्रेस पक्षाने प्राप्तिकर लवादासमोर केलेले अपील गमावले होते. काँग्रेसच्या बँक खात्यातून प्राप्तिकर विभागाने 135 कोटी काढून घेण्यास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्राप्तिकर लवादाने काँग्रेसची मागणी फेटाळून लावली. 22 मार्च रोजी प्राप्तिकर विभागाच्या शोधमोहिमेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात केलेली याचिकाही फेटाळण्यात आली. त्यामुळे जाणूनबुजून निवडणुकीच्या तोंडावर अशी कारवाई करण्यात येत आहे, तसेच आमच्या अपीलावर न्याय देण्यासाठी वेळ घालवला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
COMMENTS