पुणे : स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन अनेक विद्यार्थी पुण्यात दाखल होतात. मात्र कोरोनाचे संकट, आरक्षणाचा घोळ, यामुळ
पुणे : स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन अनेक विद्यार्थी पुण्यात दाखल होतात. मात्र कोरोनाचे संकट, आरक्षणाचा घोळ, यामुळे आयोगाकडून वेळेवर मुलाखत परीक्षा होत नसल्यामुळे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणार्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने व्यवस्थेला प्रश्न विचारत, चिठ्ठी लिहिली आहे. त्याने विचारलेल्या प्रश्नांचे पडसाद रविवारी राज्यभरात बघायला मिळाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिले, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.
एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका. येणार्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओेझे वाढत जाते. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. 2 वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि 24 वय संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळे आणि चांगले असते. हव ते, ठरवले ते प्रत्येक साध्य झाले असते. मी घाबरलो, खचलो असे मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. असे लिहित स्वप्नीलने आत्महत्या केली.
एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी; स्वप्निलच्या आईचा आक्रोश
स्वप्निलच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईचा आक्रोश काळजी पिळवटून टाकत आहे. याविषयी ‘मला माहिती आहे माझे पोरंग किती झुरायचे. दोन वर्ष माझे पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असे म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला. मला सांगा एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती, तर मंत्र्यांना जाग आली असती की नाही? तसंच जरा दुसर्यांच्या जिवाचा विचार करा ना दुसर्याच्या आईवडिलांचा विचार करा ना की, त्यांच्यावर काय परिस्थिती आली आहे. माझ्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे, हे माझं मलाच माहिती. आम्ही त्याला कसं शिकवलं? तो किती हुशार होता. हुशार होता म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. तिथपर्यंत पोहोचण्याआधी सरकारने अशी मुलं आत्महत्येकडे करावीत का?, असा जळजळीत सवाल स्वप्निलच्या आईने सरकारला केला आहे.
युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी देखील या मुद्दयावरून सरकारला विनंती केली आहे. युवा पिढी निराश असून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात, अशी विनंती रोहीत पवार यांनी ट्वीट करून केली आहे. परीक्षा घेण्यासोबतच तातडीने त्यांना नियुक्त्या देखील देण्याची विनंती केली आहे. कोरोनामुळे स्थगित केलेली एमपीएससीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
COMMENTS