सच्चा गांधीवादी

HomeUncategorized

सच्चा गांधीवादी

हिमालयात सध्या वारंवार होत असलेल्या हिमस्खलन आणि भूस्खलनाबाबत फार पूर्वीच सुंदरलाल बहुुगुणा यांनी इशारा दिला होता. तेथील बर्फाचे होणारे तलाव आणि धरणांनाही त्यांनी विरोध केला होता; परंतु त्यांचे म्हणणे न ऐकता विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी केल्याची किंमत आपण आता वारंवार मोजत असताना बहुगुणा यांची वारंवार आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
कोल्हापूरच्या माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील

हिमालयात सध्या वारंवार होत असलेल्या हिमस्खलन आणि भूस्खलनाबाबत फार पूर्वीच सुंदरलाल बहुुगुणा यांनी इशारा दिला होता. तेथील बर्फाचे होणारे तलाव आणि धरणांनाही त्यांनी विरोध केला होता; परंतु त्यांचे म्हणणे न ऐकता विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी केल्याची किंमत आपण आता वारंवार मोजत असताना बहुगुणा यांची वारंवार आठवण आल्याशिवाय राहणार नाही. चिपको आंदोलनाचे प्रणेते असलेल्या सुंदरलाल बहुगुणा हे सच्चे गांधीवादी होते. त्यांनी गांधीजींचा आदर्श ठेवून विकासाची संकल्पना राबविण्याचा आग्रह धरला होता. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. आठ मे रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने आणि त्याचबरोबर निमोनिया झाल्याने त्यांना उपचारासाठी एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह होता तसेच त्यांच्या ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. 

    आयुष्यभर पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या आणि बहुगुणा यांचा जन्म सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरी जवळच्या गावात झाला. ते तेरा वर्षांचे असताना त्यांची भेट गढवालचे स्वातंत्र्यसैनिक देव सुमन यांच्याशी झाली. त्यांना भेटल्यावर बहुगुणा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाने देशकार्य करण्यासाठी प्रेरित झाले. त्यांनी पहाडी प्रदेशात पारतंत्र्याविरोधात निषेध दर्शवायला सभा घ्यायला, पत्रके वाटायला सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी ते लाहोरला शिकायला गेले. परत आल्यावर त्यांनी हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून मोहीम उघडली. 1965 ते 1970 मध्ये टिहरी गावात आणि त्याच्या आसपासच्या गावात त्यांनी दारूबंदीची मोहीम सुरू केली. तिथे खरे तर दारू पिणे ही प्रथा नसली तरी भारत आणि चीन या मार्गावर सहजी दारू उपलब्ध झाल्याने दारूबंदीसाठी मोहीम सुरू करणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी त्यांनी महिलांना एकत्र कले आणि आंदोलने ही केली. महात्मा गांधी यांनी जसा दारूबंदीचा पुरस्कार केला, तसाच तो बहुगुणा यांनीही केला. स्वातंत्र्य चळवळीत महिलांना सहभागी करून घेण्याची कल्पनाही महात्माजींचीच. कोणतीही चळवळ महिलांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते, तसेच बहुगुणा यांनाीही. हिमालयात असलेली जंगले, झाडे यांचे रक्षण करायला हवे, याची प्रखर जाणीव त्यांना झाली. उत्तर प्रदेशातील झाडे, जंगले नष्ट करणार्‍या जंगलाच्या ठेकेदारांविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले. तेच चिपको आंदोलन. पर्यावरण विषयक चळवळ हिमालयात आणि नंतर संपूर्ण भारत देशात आणि त्याही पलीकडे पसरली. चिपको आंदोलनात स्त्रिया एकत्र येऊन साखळी तयार करत आणि खरोखरच झाडाला मिठी मारून ते तोडण्यापासून वाचवत होत्या. अगोदर आम्हाला कापा आणि मगच झाडाला कापा. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाची प्रेरणा त्यांना कर्नाटकातील अप्पीको चळवळीपासून मिळाली. पर्यावरणशास्त्र हेच खरे अर्थशास्त्र हे त्यांचे घोषवाक्य होते. त्यावेळी, बहुगुणा यांनी उपोषणही केले. या आंदोलनाचे फलित म्हणजे उत्तराखंडमध्ये सरकारने त्यानंतर 15 वर्षापर्यंत वृक्षतोडीस बंदी घातली. त्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीयस्तरावर ’इको-फेमिनिजम’ (स्त्रीवादी-पर्यावरणवाद) असेही म्हणतात. 1981 ते 1983 मध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चंबाच्या लंगेरा गावापासून पाच हजार किलोमीटरची पदयात्रा केली. ते म्हणाले, ’’जंगले आम्हाला काय देतात? राळ, इमारती लाकूड आणि परकीय चलन? आपण आपल्या वृत्ती आणि कृतीकडे डोळे उघडे ठेऊन पाहायला हवे. पुनर्विचार करायला हवा. आपण जंगले नष्ट करतो. त्यामुळे विध्वंसक पूर येतात. लोक तीर्थक्षेत्री आल्याच्या भावनेने इथे येतात आणि आम्ही त्यांना काय देतो? पूर? विनाश?’’ अशा त्यांच्या बोलण्याने त्यांनी लोकांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. जंगले आपल्याला काय देतात? माती, पाणी आणि शुद्ध हवा. माती, पाणी आणि शुद्ध हवा हेच आपले जीवन आहे. आपल्या जगण्यासाठी जंगले गरजेची आहेत. झाडांपासून इमारती लाकूड मिळवणे हा उद्देश असू शकत नाही. त्यापासून आपल्याला अन्न, चारा, इंधन आणि खत मिळते आणि हेच मूळ अर्थशास्त्र आहे. झाडे अमूल्य मातीची धूप व्हायचे थांबवतात. आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. आता कोरोनाच्या काळात प्राणवायूअभावी तरफडून मरणार्‍यांची संख्या पाहिली, तर आपल्याला त्यांच्या आंदोलनाचे महत्त्व कळू शकेल. हिमस्खलनात हजारो लोक दरवर्षी मरतात आणि कोट्यवधींची मालमत्ता नष्ट होते. टिहरी धरण बांधायचे मुख्य कारण हिमालयातून गावागावांतून वाहत येणार्‍या गंगा नदीचा मार्ग बदलून नवी दिल्लीत येणार्‍या तिच्या पाण्याचा ओघ वाढवणे, हे होते; पण त्यामुळे पहाडी प्रदेशातील लोकांना पाणी मिळणे कठीण होत होते. स्त्रियांना त्यांच्या कुटुंबासाठी मिळणार्‍या चार लिटर पाण्यासाठी रात्ररात्र वाट बघत बसायला लागायला लागली आणि म्हणून टिहरी धरणाविरोधात भागीरथी नदीच्या तीरावर त्यांनी काही वेळा अन्न सत्याग्रह केला. टिहरी धरणावर शंभर मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प ही नको आणि धरण ही जादा क्षमतेचे नको, असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यासाठी त्यांना 32 वर्षे आंदोलन केले. त्यांच्या अशा अहिंसेने चालणार्‍या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (1981), जमनालाल बजाज (1986), राईट लाईवलीहूड (1987), पद्मविभूषण (2001) अशा पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. रुरकी आयआयटीने त्यांना विज्ञानाची डॉक्टरेट पदवी मिळाली होती.

COMMENTS