मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिका प्रशासन व सत्ताधारी महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेल्या तिप्पट घरपट्टी वाढीला महापालिका कामगार संघटनेनेही विरोध केला आहे

अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अकरा डिसेंबर रोजी लोकअदालत
मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका
अहमदनगर : युनियन बॅंकेत 56 लाखांचा घोटाळा (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिका प्रशासन व सत्ताधारी महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेल्या तिप्पट घरपट्टी वाढीला महापालिका कामगार संघटनेनेही विरोध केला आहे. या घरपट्टी वाढीविरोधात शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मनपासमोर बुधवारी केलेल्या धरणे आंदोलनात मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी उपस्थित राहून या घरपट्टी वाढीला विरोध केला. नगरकरांवर जुल्मी पध्दतीने कर लादले जात आहे. सर्वसामान्य जनता संकटात असताना त्यांच्यावर करवाढीचा बोजा टाकला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, प्रत्येक नागरिकाने गुरुवारी (12 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेवकांच्या दारात जाऊन बसावे व या विषयाला विरोध दर्शविण्याचे आवाहन बहिरनाथ वाकळे यांनी केले आहे.
मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव गुरुवारी होणार्‍या महापालिकेच्या महासभेत मांडण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी या संभाव्य करवाढीच्या विरोधात मनपा समोर आंदोलन झाले. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फाऊंडेशन, गजानन हाउसिंग सोसायटी, भारतीय जनसंसद, कामगार संघटना महासंघ, इकरा सोशल क्लब, आम आदमी पार्टी आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात अशोक सब्बन, बहिरनाथ वाकळे, अनंत लोखंडे, अर्शद शेख, फिरोज शेख, महेबुब सय्यद, दीपक शिरसाठ, विजय केदारे, संजय झिंजे, संतोष गायकवाड, दत्ता वडवणीकर, संध्या मेढे, भारती न्यालपेल्ली, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, नादिर खान, विलास पेद्राम, रविंद्र सातपुते, राजेंद्र कर्डिले आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
कोरोनाच्या संकटकाळाचा विचार करुन पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी करून ग्रामपंचायतीपेक्षा दयनीय अवस्था अहमदनगर महापालिकेची झाल्याचा दावा आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी यावेळी केला. महापालिका नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असताना तसेच जनता कोविड मुळे त्रस्त असताना महापालिका कर कमी करण्याऐवजी तीनपटीने कर वाढवीत आहे. यामुळे नगरकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था, पिण्यासाठी गढूळ पाणी, अस्वच्छतेमुळे शहराचे बिघडणारे आरोग्य, प्रदूषणात झालेली वाढ या मूलभूत सोयी नागरिकांना देण्याबाबत महापालिका अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांच्या डोक्यात झोपेत दगड टाकण्याचे काम महापालिका प्रशासन करत असल्याचा आरोप वाकळे यांनी केला तर सय्यद यांनी, नगरकर कोविडमुळे त्रस्त आहेत. उद्योग, धंदा, रोजगारांची पुरती वाट लागली आहे. शहरांत अभूतपूर्व बेरोजगारी माजली आहे. लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. लोकांना जीवन जगण्याचीच समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने कर कमी करण्याची आवश्यकता असताना मात्र तीनपटीने करवाढीचा प्रस्ताव मांडला आहे. याला सर्वसामान्य जनतेचा विरोध असून, हा लढा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS