कोरोना बाधितांना खुर्चीवरच लावला ऑक्सिजन! ; ऑक्सिजन बेडची टंचाई; वायसीएम रुग्णालयावर उपचारासाठी मोठा ताण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना बाधितांना खुर्चीवरच लावला ऑक्सिजन! ; ऑक्सिजन बेडची टंचाई; वायसीएम रुग्णालयावर उपचारासाठी मोठा ताण

पिंपरी शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला आहे.

नगर मनपाचे नगरसेवक फक्त सांगकामे झालेत…भाजप नगरसेवक कोतकरांचा उद्विग्न दावा
खंडणी घेतली…व तीही चक्क फोन पे वरून…
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

पुणे/प्रतिनिधीः पिंपरी शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला आहे. ज्या रुग्णांना गंभीर लक्षणे आहेत, ज्यांची  ऑक्सिजन पातळी ही 90 पेक्षा कमी आहे, अशा रुग्णांना येथे दाखल केले जात आहे; परंतु रुग्ण वाढल्याने येथे ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच रुग्णांच्या रांगा लागत आहेत. काही रुग्ण अक्षरशः खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसर्‍या मजल्यावरील दोन वार्डातही  कोरोनाचे रुग आहेत, तर दोन वॉर्ड हे कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील एक अतिदक्षता विभाग कोरोना रुग्णांसाठी तर एक अतिदक्षता विभाग इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. फक्त चौथा मजला हा इतर रुग्णांसाठी राखीव ठेण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअरचे आयसीयू येत्या एक ते दोन दिवसांत ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्यासारखी स्थिती आहे. या रुग्णालयांमध्ये कोरोना आणि इतर आजारांच्या रुग्णाची ये-जा असते. त्यामुळे नेमका कोणता रुग्ण कोरोनाचा आहे, हे लक्षात येत नाही. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे असल्याने त्याचा परिणाम हा बाह्य रुग्ण विभागावर झाला आहे. रोज होणारी ओपीडी कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी असताना रोज साधारण 1500 रुग्णांची ओपीडी होत होती. सद्यस्थितीत रोज 500 रुग्णांची ओपीडी होत आहे. कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी सध्या फक्त सात कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी 15 ते 20 कर्मचार्‍यांची गरज आहे. रुग्णाला दाखल करताना या कर्मचार्‍यांना रुग्णासोबत जावे लागते. ज्या वॉर्डमध्ये रुग्णाला र् दाखल केले, तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जावे लागते. तसेच रुग्णालयात जागा नसल्यास इतर ठिकाणी रुग्णाला पाठविले तर तिथेही या कर्मचार्‍यांना जावे लागते. रुग्णाला दाखल करून घेण्याची पूर्ण प्रक्रिया यांना करावी लागते. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाढविण्यात येणे गरजेचे झाले आहे. 

रुग्णांची वायसीएमलाच पसंती

रुग्णालयात एकूण पाचशे परिचारिका आणि वार्ड बॉयची गरज आहे. प्रत्यक्षात 345 कर्मचारी उपलब्ध आहेत. मदतनीस आणि इतर कामासाठी 315 कर्मचार्‍यांची गरज असून सध्या 255 कर्मचारी आहेत. सुरुवातीपासून वायसीएमचा मृत्यू दर हा कमी आहे. सुविधा उपलब्ध आहेत. महापालिकेच्या इतर रुग्णांलय आणि जम्बोच्या तुलनेत रुग्ण वायसीएममध्ये दाखल होण्यासाठी रुग्ण आग्रह धरत आहेत. रुग्णालयात सध्या फक्त अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुरू आहे. इतर शस्त्रक्रिया बंद आहेत.

COMMENTS