अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मकेंद्री लोकशाहीचे विकेंद्रीकरण करुन राष्ट्रहितासाठी लोकशाहीऐवजी भारतशाही राबविण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन व भारतीय
अहमदनगर (प्रतिनिधी)-
आत्मकेंद्री लोकशाहीचे विकेंद्रीकरण करुन राष्ट्रहितासाठी लोकशाहीऐवजी भारतशाही राबविण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने दिवाळीच्या नरकचतुर्थीला गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मारकात ठेवण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
1950 साली या देशात भारतीय संविधान आले. संविधानाचे मुख्य सूत्र आंम्ही भारतीय असा घोषित करण्यात आला. भारत म्हणजे या देशातील तमाम जनता आहे. परंतु गेल्या स्वातंत्रोत्तर 75 वर्षात लोकशाहीच्या नावाखाली जात, धर्म, पंथ, आणि प्रादेशिक वाद यालाच नागरिकांनी प्राधान्य दिले. देश मी आणि माझ्या कुटुंबासाठी या संकुचित विचाराने सार्वजनिक निवडणुकांमध्ये मत खरेदी, दहशत, जात-धर्म या घटकांचा विचार झाला आणि देशाचे हित म्हणजे तमाम भारतीयांचे हित ही बाब गौण ठेवण्यात आली. यामुळे लोकशाही आत्मकेंद्री बनली. त्याचा परिणाम शासन, प्रशासनामध्ये भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी, टक्केवारी या बाबी पोसण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
होईल ते होऊ दे मला काय त्याचे? ही मकात्या प्रवृत्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोपासण्यात आल्यामुळे देशाच्या हितापेक्षा स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा वाढला. देशात आत्मकेंद्री लोकशाही निर्माण झाल्याने वोटमाफियाचे रुपांतर सत्तासूरात झाले. तर मतदार ढब्बू मकात्या बनले. त्यामुळे लोकशाहीचा विकसित भाग म्हणून या देशात भारतशाही राबविण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जात, धर्म, पंथ, प्रादेशिक वाद आणि सर्व स्वार्थापेक्षा देश आणि देशातील तमाम जनता मोठी आहे. ही बाब विचारांचा गाभा ठरण्याची आवश्यकता आहे. आज सगळीकडे सत्तासूर निर्माण झाले आहेत. त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्यासाठी घराघरात आणि देशभरात भारतशाही खर्या अर्थाने राबविण्याची गरज असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
COMMENTS