मिरजगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे टोळीचा पर्दाफाश कर्जत : रात्रीच्या चोऱ्या व घरफोड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान मिरजगाव पोली

मिरजगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे टोळीचा पर्दाफाश
कर्जत : रात्रीच्या चोऱ्या व घरफोड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान मिरजगाव पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे हरणाची शिकार करून तसेच दोन जिवंत हरीण पकडून घेऊन जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. या कारवाईत दोन निरपराध हरिणांचे प्राण वाचले, मात्र एका हरिणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. या प्रकरणी वन विभागाने चार पुरुष व एका महिलेविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दि. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास चांदे–बिटकेवाडी जंगल परिसरात गस्त घालत असताना दोन दुचाकींवरून जाणारे चार पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करताच एका दुचाकीवरील दोन संशयितांनी गाठोडे व दुचाकी घटनास्थळीच टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला, तर दुसऱ्या दुचाकीवरील संशयित दुचाकीसह फरार झाले.
घटनास्थळी सापडलेल्या गाठोड्यांची तपासणी केली असता, त्यात शिकार करून ठार मारलेले एक हरिण व पाय-तोंड बांधलेल्या अवस्थेत दोन जिवंत हरीण आढळून आली. यापैकी एका जिवंत हरिणास तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या घटनेची माहिती तत्काळ वन विभाग, मिरजगाव यांना देण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले यांच्यासह वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे व दिनकर लिलके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जप्त केलेली हिरो कंपनीची दुचाकी, हरिण पकडण्यासाठी वापरण्यात आलेली जाळी, दोरी, शाल, विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच एक जिवंत व एक मृत हरिण असा सर्व मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.वन विभागाने पंचनामा करून चार पुरुष व एका महिलेला संशयित आरोपी म्हणून निष्पन्न केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS