
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी गुरूवारी प्रथमच भाषण करत विरोधकांना चांगलेच सुनावले. तसेच त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत राज्यातील नागरिकांना आश्वास्त केले. तसेच आपली जात ही महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने गौण मुद्दा असल्याचे सांगत जनतेने आपले नेतृत्व कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता स्वीकारल्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केला. जात, धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय , सर्वजनसुखाय, असे काम मी केले होते. जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी जनतेच्या मनात नाही, हे यंदाच्या निवडणुकीने दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी वेगळे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, ते उद्ध्वस्त झाले, समाज एकसंध झाला, सगळ्यांना महायुतीला मतदान केले. गेल्या 30 वर्षांत 50 टक्के मते कोणाला मिळाली नाहीत, ती महायुतीला मिळाली. मी म्हटले होते, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येते, माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे. याचे श्रेय माझे नाही, माझ्या पक्षाचे आहे आणि माझ्यासोबत काम करणार्या सहकार्यांचे आहे. मी एवढेच म्हणेन की, ’आंधीयो मे भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पुछ लेना मेरा पता मिल जाएगा’, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
लाडक्या बहिणींना अधिवेशनानंतर मिळणार पैसे
लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांसदर्भात बोलतांन म्हणाले की, मी सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. एकही योजना बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपताच डिसेंबरचा हप्ता जमा होईल. कोणतेही नवे निकष नाहीत. पण काहींनी चार-चार खाती उघडली आहेत. कोणी गैरफायदा घेत असेल तर ते रोखणे आपली जबाबदारी आहे. शेतकरी, तरुण आणि वंचितांना दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS