मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता

मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका यांची एकत्र बैठक घेऊन नळ जोडणीची (टॅपिंगचे) कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार स्नेहा-दुबे पंडित, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वसई-विरार महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अभियान संचालक सुषमा सातपुते, कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, अजय सिंह उपस्थित होते.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. वसई-विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेची कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण करावीत. तसेच वितरण व्यवस्थेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणी जोडणीसाठी टॅपिंगचे काम पूर्ण करुन सर्वांना पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. अर्नाळा व १६ गावे, तिल्हेर व १२ गावे, अर्नाळा किल्ला व ७ गावे या योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
COMMENTS