सातारा/प्रतिनिधी ः शिवशाही बसने पेट घेण्याच्या घटना ताज्या असतांनाच, सोमवारी सातारा-पुणे महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून जवळ असलेल्या पुलावर ए

सातारा/प्रतिनिधी ः शिवशाही बसने पेट घेण्याच्या घटना ताज्या असतांनाच, सोमवारी सातारा-पुणे महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून जवळ असलेल्या पुलावर एक प्रवासी बस पेटली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या अलिकडे असलेल्या पुलावर महाराष्ट्र परिवहन विभागाची विठाई बस पेटली. बस पेटल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. थोड्याच वेळात ही बस पूर्णपणे पेटली. महामार्गावर दूरपासून या बसच्या ज्वाला व धुराचे लोट दिसून येत होते. पोलिसांनी तत्परतेने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडने वळवून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बसचे खूप नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवली. विठाई बस पेटल्याचे समजताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवले. बसला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. तेव्हा या घटनेचे काही प्रवाशांनी चित्रिकरण केले. महाराष्ट्रात यापूर्वी शिवशाही बसमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता विठाई बसने पेट घेतल्याचे समोर आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. बस पेटतातच कशा, असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.
COMMENTS