शिर्डी : गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील. अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येई

शिर्डी : गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील. अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता येथे झालेल्या गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून अधिकचे पाणी शेतील कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, गोदावरी उजव्या कालवा नूतनीकरणासाठी १९१ कोटींची मान्यता शासनाने दिली आहे. डावा व उजवा कालव्याच्या चारी दुरूस्ती करिता २६० कोटींचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यास मान्यता देण्यात येईल. साधारणतः ४५० कोटी फक्त गोदावरी खोऱ्यावर शासन खर्च करणार आहे. पश्चिम वाहिनीनदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या सर्वेक्षणासाठी ६५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. गोदावरी खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी वळविणे हे जलसंपदा विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वांना समप्रमाणात पाणी मिळावी ही शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी चारी क्र.११, १२ व १३ मध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळणार आहे. पिंपळवाडी चारी क्र. १४ स्वतंत्र पाइपलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे यांचीही भाषणे झाली.
गोदावरी कालव्यातील रब्वी- खरीप हंगाम २०२४-२५ च्या आवर्तन नियोजनाबाबत श्री.गोवर्धने यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. रब्बी १ व उन्हाळ्यात २ आवर्तन देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS