Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभर मराठा आंदोलनाचा भडका

विशेष अधिवेशन बोलावण्याची मनोज जरांगे यांची मागणी

जालना/मुंबई ः राज्यभरात मराठा आंदोलनाचा भडका उडाला असून, अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी देखील बीडमध्ये मराठ

मराठा आरक्षणावर टांगती तलवार कायम
मराठा आरक्षणासाठी धावपळ सुरू
सकल मराठा समाजाचा निर्धार आरक्षण घेतल्याशिवाय  मुंबई सोडायची नाही 

जालना/मुंबई ः राज्यभरात मराठा आंदोलनाचा भडका उडाला असून, अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी देखील बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळले. बीडच्या वडवणी शहरात आंदोलकांनी शासकीय कार्यालयांवर दगडफेक केली. आंदोलकांनी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तहसील कार्यालय फोडले. या दगडफेकीनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बीडप्रमाणेच कोल्हापूरमध्येही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापुर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्यासमोर बसवर दगडफेक करण्यात आली. मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा देत कुरुंदवाड-पुणे एसटीवर दगडफेक करण्यात आली असून घटनेची शिरोळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तातडीने विशेष अधिवेशन बोलवा ः मनोज जरांगे – दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्‍नी आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर सरकारकडून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटलांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली. दोघांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर 24 मिनिटे चर्चा झाली. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केले. याबाबत माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवर आरक्षणावरच चर्चा झाली. दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्या समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊही नका, असे मी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही आमची बैठक बोलावली आहे. आम्हीही त्यावर चर्चा करणार आहोत. कुणबी आणि मराठा एकच असल्याचा 2004 चा जीआर आहे. त्यामुळे जीआर दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत, असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. आमदार -खासदार राजीनामा का देत आहेत हे कळत नाही. राजीनामा देण्यामागचा फायदा-तोटा मला कळत नाही. पण मी सर्व आमदार-खासदारांना सांगतो की तुम्ही मुंबईतच थांबा. आरक्षण मिळाल्याशिवाय यांचा पिच्छा सोडू नका. आम्ही काय इथून हटत नाही. सर्व आमदार-खासदार, माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रचंड मोठा गट तयार करावा. मुंबई सोडायची नाही. मंत्रायल आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दारे सोडायची नाहीत. त्यांचे पाय पकडून त्यांच्या मागे लागायचे. सरकारला अधिवेशन घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरा. मराठा समाज यांना कधीच विसरणार नाही असा शब्द देतो, असे आश्‍वासनही मनोज जरांगेंनी यावेळी दिले.

COMMENTS