राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, जयंत पाटील यांच्या जागेवर सातारा येथून असलेले शशिकांत शिंदे यांना पक्षाच

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, जयंत पाटील यांच्या जागेवर सातारा येथून असलेले शशिकांत शिंदे यांना पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. सातारा हे तसं भोसले घराण्यासाठी राज वारसा असल्यामुळे शरद पवार हे या भागाच्या आजूबाजूला अधिक केंद्रित असतात. दिवंगत आर आर पाटील आणि जयंत पाटील हे देखील सांगलीचे असले तरी सांगली-सातारा हा महाराष्ट्रात संयुक्तपणे येणारा शब्द आहे. शशिकांत शिंदे यांनी पदावर आल्यानंतर आपण आर आर पाटील यांच्यासारखे काम करू; असे थेट वक्तव्य केले आहे. अर्थात ,आर आर पाटील यांच्या संदर्भात जर आपण त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर, त्यांच्या कार्यापेक्षा माध्यमांनी त्यांना अधिक मोठं केलं होतं; हे नाकारता येणार नाही! वास्तविक जयंत पाटील आणि आर आर पाटील यांचा सांगली-सातारा हा भाग बालेकिल्ला झाला. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या भागातून त्यांनी संभाजी भिडे यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. परिणामी राजकीय नेतृत्व त्यांच्याकडे राहिलं. आता शशिकांत शिंदे देखील त्याच भागातून येतात. त्यामुळे, शरद पवार यांची ही अध्यक्षपद निवडीची खेळी अधिक चतुराईची आहे, असं नाकारता येत नाही. शरद पवार हे नेहमीच दोन डगरींवरचं राजकारण खेळत असतात. एकाच वेळी ते दोन बाजूने झुकलेले असतात. त्यामुळे त्यांचं राजकारण हे शेवटच्या क्षणापर्यंत अनाकलनीय ठरत राहत. आपण २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन्ही पंचवार्षिकच्या सुरुवातीच्या काळात सत्ता स्थापनेचा घटना पाहिली तर २०१४ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून बिन शर्त पाठिंबा त्यांनी दिला होता. मात्र, काही दिवसातच शिवसेना आणि भाजपची पुन्हा दिल जमाई होऊन युतीचे सरकार महाराष्ट्रात आलं होतं. २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी अधिक गाजला आणि या दोन्ही बाबी हे दर्शवतात की शरद पवार हे नेहमी सत्तेच्या जवळपास असतात. सातारा मधून शशिकांत शिंदे यांना पक्षाच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यामागे देखील याच राजकारणाचा भाग आहे; असं नाकारता येत नाही. अर्थात, शरद पवार यांनी उघडपणे जर राजकारण केलं तर निश्चितपणे त्यांच्यावरचा राजकीय विश्वास वाढायला मदत होईल. परंतु, आतून त्यांच राजकारण वेगळं असतं आणि बाहेरून त्यांचं राजकारण वेगळं असतं. म्हणजे एकाच वेळी प्रतिगामी आणि पुरोगामी अशी दोन्ही स्वरूप शरद पवार यांच्या राजकारणात असतात आणि हे दोन्ही स्वरूप ते कायम ठेवून आपल्या पक्षाच्या नेतृत्व निवडीच्या साठी देखील तेही निकष वापरत असतात. प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा अन्य काही पदे असतील जेव्हा ते पदांच वाटप करतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये ही अशा प्रकारची गोळाबेरीज असते. या गोळाबेरीज मधून शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं सत्ता संपादनाइतकं नसलं तरी, सत्तेच्या चौकटीत आपलं राजकारण बसवून घेणे व त्यांची ताकद ते निर्माण करून घेतात. भारतीय राजकारणात मुत्सद्दी, चाणाक्ष अशा अनेक विशेषणांनी युक्त असे राजकीय नेते होऊन गेले. परंतु त्या सगळ्यांच्या राजकारणामध्ये मुत्सद्दीपणाबरोबर वैचारिक बैठकही असते. परंतु, शरद पवार यांचे राजकारणामध्ये वैचारिक बैठकीचा अभाव असतो आणि केवळ मुत्सद्दी पणाही त्यांच्या राजकारणाला म्हणता येऊ शकत नाही; तर विश्वासघाताचे राजकारण हेच त्यांच्या राजकीय नेतृत्वाची वैशिष्ट्य आहे.

COMMENTS