Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानगरपालिका सक्षम पद्धतीने हाताळणारी भाजपची पहिली महिला महापौर कोण होणार ?

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि तर्कवितर्कांचे वातावरण आहे. विशेषतः राज्यसभेचे खास

नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !
नांदेडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; मास्टरमाइंड बिहारचा
नायगाव तालुक्यातील ‘कीर्ती गोल्ड’ कंपनीवर धाड

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि तर्कवितर्कांचे वातावरण आहे. विशेषतः राज्यसभेचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा राजकारणात धक्का-तंत्र वापरणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने, यावेळी ते कोणाला महापौरपदाचा बहुमान देणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
ज्योती कल्याणकर, कविता मुळे, रुची भारतीया, वैशाली देशमुख यांच्यासह माजी महापौर शैलजा किशोर स्वामी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र या सर्व नावांवर अंतिम शिक्कामोर्तब कोण करणार, हा खरा कळीचा प्रश्‍न ठरत आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सध्याची बिघडलेली अवस्था, प्रचंड आर्थिक कर्ज, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली महानगरपालिकेची अर्थव्यवस्था, अत्यंत कमी होत असलेली वसुली रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय विस्कळीतपणा पाहता, शहराला सक्षम, निर्णयक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे एक महिला महापौर देऊन नवे नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना, महापौर कोण होणार याचा निर्णय भाजपाची राज्यस्तरीय कोअर कमिटी घेईल, असे स्पष्ट केले. या विधानामुळे राजकीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. एकीकडे अशोकराव चव्हाण यांचे नांदेडमधील राजकीय वजन, त्यांचा प्रभाव आणि अनुभव पाहता, त्यांच्याकडेच अंतिम निर्णयाचे सूत्र आहे, असे मानणारा गट आहे. तर दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचा उल्लेख झाल्याने, निर्णय सामूहिक आणि संघटनात्मक पातळीवर होणार असल्याचे संकेतही मिळतात. यातूनच एक प्रश्‍न उपस्थित होतो की, भाजपाचा पहिला महापौर ठरवण्याचे सर्वाधिकार अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहेत की पक्षाच्या कोअर कमिटीकडे? ही संदिग्धता अद्याप दूर झालेली नाही. मात्र, नांदेडसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी केवळ राजकीय गणित नव्हे, तर प्रशासनाची दिशा बदलू शकेल असे नेतृत्व निवडणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
महापौरपदाच्या या चुरशीच्या शर्यतीत कोण बाजी मारतो, यापेक्षा नांदेड शहराला स्थैर्य, विकास आणि विश्‍वास देणारा महापौर कोण ठरतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्‍नावर पडदा उठणार असला, तरी तोपर्यंत नांदेडच्या राजकारणात उत्सुकतेची धग कायम राहणार आहे.

COMMENTS