मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील मुख्यालय असलेल्या मेढा नगरीमध्ये सध्या नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचवेळी भ्रम करणारे राज

मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील मुख्यालय असलेल्या मेढा नगरीमध्ये सध्या नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचवेळी भ्रम करणारे राजकारणही रुळावर येऊ लागले आहे. करवाढीच्या स्थगितीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात पत्रव्यवहार झाला आहे. असे असताना आम्हीच मेढा नगरीची कर वाढ स्थगिती दिली आहे. असा भ्रम करणारे कदम नया है! अशा शेलक्या शब्दात सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांनी मेढा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जावळी तालुक्याच्या वतीने मेढा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांच्यासह शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, एकनाथ ओंबळे, रणजीतसिंह भोसले, संजय सुर्वे, सचिन जवळ, सचिन गोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये भाषण करताना पालकमंत्र्यांकडे मेढा नगरपंचायतीच्या कर वाढीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा सातत्याने भाजपचे नेते पाठपुरावा करत असताना सध्या आमच्यामुळेच मेढा नगरपंचायतीची कर वाढ स्थगिती झाल्याचा आयत्या पिठावर रेगोटी ओढण्याचा प्रकार होत आहे. वास्तविक पाहता सर्व महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या करवाढीबाबत सामुदायिक रित्या स्थगिती देण्यात आली आहे. तशा प्रकारचा शासनाचा आदेशही निघाला आहे. त्या आधारे आपणच मेढा येथील करवाढीस स्थगिती दिल्याचे भासवण्यासाठी खोटं बोला पण रेटून बोला हा पॅटर्न जावली तालुक्यात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याला सडेतोड उत्तर मेढा नगरीतील जागरूक नागरिकांनी दिलेले आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला लोक जमले नाहीत. कारण लोकांना विकास कामे हवे आहेत, मनोरंजन नको.
याबाबत भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांनी सौम्य पण शेलक्या शब्दात युवा नेते अंकुश कदम यांचा समाचार घेतला आहे. सन 1965 च्या अधिनियमाप्रमाणे नगरपंचायत नगरपालिका कर आकारणी करते. यावेळी स्लॅबचे घर, पत्र्याचे घर व मोकळी जागा अशा संदर्भात नेमका किती कर आकारणी करावी? याची नियमावली ठरवण्यात आलेली आहे. त्या आधारित कर आकारणी होते. मेढा नगरपंचायतीने कर वाढीचा प्रस्ताव सादर केला असला तरी कुणाकडूनही जबरदस्तीने कर गोळा केलेल्या नाही. नागरिकांना कोणताही आर्थिक भुर्दंड झाला नाही. तरीही काही जणांना राजकारण करायचे असल्यामुळे वावड्या उठवल्या जात आहेत. निवडणुकीनंतर हे कोणीही दिसणार नाही. कारण, गेल्या 30 वर्षाचा असे बरेच कदम पाहिले आहेत. हा कदम नया है! असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळेला मेढा नगरीचे जागरूक नागरिक व नेते दत्ता पवार-मेढेकर, कांतीबाई देशमुख, पांडुरंग जवळ, नारायण शिंगटे, दत्ता वारागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS