Homeताज्या बातम्यादेश

मसुरीतील राष्ट्रीय सुशासन केंद्रात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाची सुरूवात

नवी दिल्ली ः टांझानियाच्या अधिकार्‍यांसाठी आज मसुरी येथील राष्ट्रीय सुशासन केंद्रात (एनसीजीजी) सार्वजनिक कार्यांसाठीचे प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थ

अनियमित कोळसा पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती संकटात
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केली निवृत्तीची घोषणा
मताचे राजकारण सर्वांसाठी घातक

नवी दिल्ली ः टांझानियाच्या अधिकार्‍यांसाठी आज मसुरी येथील राष्ट्रीय सुशासन केंद्रात (एनसीजीजी) सार्वजनिक कार्यांसाठीचे प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थापन यावर आधारित दोन आठवडे कालावधीच्या क्षमता उभारणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (एमईए) भागीदारीसह, 6 मे 2024 ते 17 मे 2024 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
टांझानिया सरकारमधील राष्ट्रीय रस्ते संस्था, उर्जा मंत्रालय, नियोजन आयोग, टांझानिया इमारत उभारणी संस्था, ई-सरकार प्राधिकरण, उर्जा आणि जल नियामकीय प्राधिकरण, राष्ट्राध्यक्ष कार्यालय सार्वजनिक सेवा व्यवस्थापन आणि उत्तम प्रशासन, प्रादेशिक प्रशासन आणि स्थानिक प्रशासन, पशुधन आणि मत्स्यविभाग यांच्यासह टांझानियातील इतर अनेक संस्था आणि मंत्रालयांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण 39 अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. एनसीजीजी ही केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था असून ही संस्था राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर कृतीविषयक संशोधन, अभ्यास आणि क्षमता उभारणीसाठी कटिबद्ध आहे. एनसीजीजीचे प्रयत्न ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘संपूर्ण जग हे एक मोठे कुटुंब’ या भारतीय तत्वज्ञानाशी  सुसंगत आहेत आणि ते इतर देशांशी भारताचे द्विपक्षीय बंध मजबूत करण्यावर तसेच सहकाराची जोपासना करण्यावर अधिक भर देतात. उपरोल्लेखित क्षमता निर्मिती कार्यक्रम समृध्द आंतरदेशीय अनुभव तसेच धोरणविषयक मंच उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करतानाच विविध क्षेत्रांमधील प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष एकाग्र करून त्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यावर आधारित आहे. यामुळे कार्यक्रमात सहभागी अधिकार्‍यांना ज्या पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्यात येते आणि ते अंमलात आणले जातात त्याविषयी मौलिक माहिती प्राप्त होते. तसेच ज्या प्रकारे संस्थामध्ये परिवर्तन घडवले जाते आणि जनतेला सरकारच्या जवळ आणले जाते त्याबद्दल माहिती मिळते. राष्ट्रीय सुशासन केंद्राचे (एनसीजीजी) महासंचालक तसेच प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे (डीएआरपीजी)सचिव व्ही.श्रीनिवास यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात सहभागी अधिकार्‍यांचे सस्नेह स्वागत केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारत आणि टांझानिया या देशांदरम्यान असलेले परस्पर संबंध तसेच क्षमता निर्मिती कार्यक्रमाच्या क्षेत्रातील भविष्यकालीन सहयोगी संबंधांची रूपरेषा याबद्दल चर्चा केली. प्रशासनाच्या उत्क्रांत पावत असलेल्या परिदृश्यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी प्रशासनाच्या नव्या आयामांबाबत माहिती देणारे तपशीलवार सादरीकरण केले. तसेच त्यांनी यावेळी प्रशासनाची कार्यक्षमता आणि विकास कमाल पातळीपर्यंत नेण्यात तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी भूमिकेवर अधिक भर देऊन नागरिकांना सरकारजवळ आणण्याबाबत देखील चर्चा केली. राष्ट्रीय ई-सेवा वितरणविषयक मूल्यमापन तसेच वर्ष 2047 साठी भारताची संकल्पना याबाबत विस्तृत माहिती देऊन व्ही श्रीनिवास यांनी आधार कार्ड, फिनटेकमधील प्रगती, सीपीजीआरएएमएस सारख्या सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा आणि प्रशासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या अनुकरणीय प्रशासन नमुन्यांचे वर्णन केले.

COMMENTS