किनवट : जनतेच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली मालमत्ता प्रशासकीय अनास्थेमुळे कशी धूळखात पडू शकते, याचे जिवंत उदाहरण किनवट नगरपालिके

किनवट : जनतेच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली मालमत्ता प्रशासकीय अनास्थेमुळे कशी धूळखात पडू शकते, याचे जिवंत उदाहरण किनवट नगरपालिकेत पाहायला मिळत आहे. सुमारे 35 ते 40 लाख रुपये किमतीची सुसज्ज ’शववाहिनी’ गेल्या 9-10 महिन्यांपासून नगरपालिकेच्या आवारातच उभी असून, ती रंजल्या-गांजल्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यास पालिकेला अद्याप ’मुहूर्त’ सापडलेला नाही.
गरिबांना आणि गरजूंना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाहून नेण्यास अडचण येऊ नये, या उदात्त हेतूने ही नवीन कोरी ’डेड बॉडी ट्रान्सपोर्ट व्हॅन’ खरेदी करण्यात आली होती. मात्र, खरेदी केल्यापासून ही गाडी पालिकेच्या आवारातच उभी आहे. उन्हाळा गेला, पावसाळा संपला आणि आता हिवाळाही सरत आला, तरीही या गाडीचे चाक हललेले नाही. एकीकडे सर्वसामान्यांना खासगी वाहनांसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत, तर दुसरीकडे 35-40 लाखांची सरकारी मालमत्ता गंज धरत आहे. नऊ महिने उलटूनही: पालिकेने ही गाडी स्वतःच्या ताब्यात घेऊन चालक का नेमला नाही? जर पालिकेला चालवणे शक्य नसेल, तर एखाद्या सामाजिक संस्थेला ही गाडी हस्तांतरित का केली नाही? ’स्मार्ट’ नियोजनाच्या गप्पा मारणारे प्रशासन या महत्त्वाच्या सुविधेबाबत इतके निगरगट्ट का? असे अनेक टोकदार प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी अशा प्रकारे पडून राहिल्याने किनवटच्या जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने ही गाडी केवळ शोभेची वस्तू म्हणून आणली आहे का? असा खोचक सवालही आता विचारला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून ही शववाहिनी त्वरित कार्यान्वित करावी, अन्यथा प्रशासकीय दिरंगाईविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

COMMENTS