नगरमध्ये दंगली घडवण्याचे षडयंत्र शिजत आहे काय? : शहर काँग्रेसची पोलिसांना विचारणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये दंगली घडवण्याचे षडयंत्र शिजत आहे काय? : शहर काँग्रेसची पोलिसांना विचारणा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?, अशी विचारणा शहर काँग्रेसने पोलिसांना केली असून, याबाबत सखोल तपासाची मागणी प

नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल- विनायक नरवडे

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?, अशी विचारणा शहर काँग्रेसने पोलिसांना केली असून, याबाबत सखोल तपासाची मागणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने नुकतीच पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, याबाबत आवश्यक चौकशीची ग्वाही पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. मागील काही दिवसापूर्वी नगर शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना अज्ञात लोकांकडून धमकी पत्र पाठवण्यात आली आहेत. यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजते आहे की काय ? असा सवाल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे करून, या प्रकाराचा सखोल तपास करण्याची मागणी केली. यावेळी काळे यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खालील सय्यद, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, महासचिव इम्रान बागवान, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे उपस्थित होते.

महापुरुषांचा अवमान
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात शहर काँग्रेसने म्हटले आहे की, काही राजकिय पक्षांच्या व सामाजिक चळवळीमध्ये काम करणार्‍या व्यक्तींच्या नावे पाठविण्यात आलेल्या निनावी धमकी पत्रांमध्ये देशातील महापुरुषांच्याबद्दल अत्यंत चुकीचे शब्द लिहीत समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न या धमकी पत्रांमधून होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे या धमकी पत्रामधील मजकुराविषयी शहरामध्ये नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नगर शहरामध्ये यापूर्वी अनेकवेळा जातीय व धार्मिक दंगली झाल्याचा इतिहास आहे. या पार्श्‍वभूमीवर, या धमकी पत्रांमधून विविध जाती-धर्माच्या तसेच वेगवेगळ्या समाज समूहाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या माध्यमातून नगर शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचे कटकारस्थान शिजते आहे की काय, हा सवाल उपस्थित होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून अशा चुकीच्या गोष्टींमुळे जर भविष्यात वेगवेगळ्या धर्मामध्ये व समाजामध्ये तेढ निर्माण झाली तर याला विपरीत वळण लागत दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही निनावी धमकी पत्रे पाठवणारी विकृत माणसे नेमकी कोण आहेत ? त्यांचा यामागील हेतू काय आहे ? याचा कसून तपास करीत संबंधितांना लवकरच जेरबंद करावे व त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

COMMENTS