उस्फुर्त आणि सळसळत्या चैतन्याचा झरा म्हणजे तारुण्य! या तारुण्य सुलभ युवकांमध्ये आता ज्या ज्या क्षेत्राची क्रेझ आहे, त्यापैकी, क्रिकेट हे सर्वोच्च

उस्फुर्त आणि सळसळत्या चैतन्याचा झरा म्हणजे तारुण्य! या तारुण्य सुलभ युवकांमध्ये आता ज्या ज्या क्षेत्राची क्रेझ आहे, त्यापैकी, क्रिकेट हे सर्वोच्च क्रेझ असलेलं एक क्षेत्र आहे. क्रिकेट आणि आयपीएल सारख्या स्पर्धांमधून भारतीय तरुण वेगवेगळ्या संघांशी भावनिकरित्या जुळला गेला आहे. वास्तविक, ज्या राज्याची टीम असते, त्या राज्यातील युवकांना पूर्णपणे त्या संघात संधी असते, असं नाहीच. केवळ तीन-चार लोकांना त्यापैकी संधी मिळते; परंतु, संपूर्ण राज्याचे युवक त्या संघाशी भावनिकदृष्ट्या एकमय होऊन जातात. आयपीएल सारख्या स्पर्धांमधूनही आपण ही कायम पाहिलंय की, महाराष्ट्र आणि मुंबई मधल्या युवकांची सर्व क्रेझ ही मुंबई इंडियन्सवर असते; तर, तामिळनाडू सारख्या युवकांचे मोठ्या प्रमाणात लोकप्रियतेचे शिखर म्हणून चेन्नई संघ असतो; तर, असाच आरसीबी रॉयल चॅलेंज बेंगलोर हा संघ गेली १८ वर्षे आयपीएल खेळतो आहे. या संघामध्ये विराट कोहली सारखा भारताचा अतिशय वेगवान आणि तितकाच कलात्मक असा फलंदाज याचा समावेश आहे. ज्यावेळेस त्याने क्रिकेटमध्ये प्रवेश केला, त्यावेळी सचिन तेंडुलकर देखील त्याच्याविषयी म्हटला होता की, माझं रेकॉर्ड ब्रेक करणारा हा खेळाडू असेल, आणि झाले तसेच. विराट कोहली अजूनही क्रिकेट खेळतो आहे. परंतु, या संघाची लोकप्रियता कर्नाटकाच्या आणि बेंगलोर मधल्या युवकांवर एवढी होती की, त्यांनी १८ व्या वर्षी विजयाचा जल्लोष करण्यासाठी काढलेल्या रॅलीत संपूर्ण कर्नाटकामधील आणि बेंगलोर मधील एवढे युवक उस्फूर्तपणे सामील झाले की, त्यामुळे अक्षरशः चेंगराचेंगरी होऊन किमान ११ युवकांचा नाहक बळी गेला आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या या युवकांचा बळी गेला, तो केवळ क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवरिल प्रेमामुळेच! वास्तविक, या संघाने जिंकलेल्या चषकामध्ये या युवकांना काहीही प्राप्त होणार नव्हते! परंतु, कुठल्याही गोष्टीची लोकप्रियता जेव्हा शिगेला असते, त्यावेळी कोणतीही व्यक्ती किंवा तरुण त्याविषयी स्वार्थाची अपेक्षा करत नाही. निस्वार्थपणे हे समर्थन असतं आणि त्यालाच लोकप्रियता म्हणतात. त्यामुळे, क्रिकेट सारख्या संघांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या युवकांच्या कुटुंबीयांना भारतीय क्रिकेट बोर्डाने आणि भारतातील आयपीएल मधील सर्व संघांच्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या मानधनातून काही भाग वित्तीय मदत म्हणून या ११ जणांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून द्यायला हवी. कारण, कोणताही युवक हा आपल्या कुटुंबाचा एक प्रकारे आधारस्तंभ असतो आणि अचानक या क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेमुळे या युवकांनी घेतलेला सहभाग, सुरक्षारक्षकांनी केलेलं दुर्लक्ष आणि सुरक्षा दलांना एकंदरीत ही रॅली नियंत्रित करता आली नाही. कोणत्या ठिकाणाहून किती युवक येतील याचा अंदाज नसला तरी, अशा प्रकारच्या मागच्या वर्षी जागतिक चषक जिंकल्यानंतर मुंबईत दिसले होते. अशाच प्रकारची रॅली निघाली होती, ज्यामध्ये मुंबईच्या नरिमन पॉईंट वर लाखोंच्या संख्येने युवक-युवती उतरले होते. त्यामुळे, देशामध्ये अशा प्रकारची युवकांची क्रेझ ही स्पष्ट झालेली असतानाही, बेंगलोरच्या सुरक्षा दलांनी, पोलीस यंत्रणेने बेपर्वाई केली; असं प्राथमिकदर्शी दिसून येते. त्यामुळे, या संदर्भात ज्यांनी दुर्लक्ष किंवा बेपर्वाई केली. त्यांच्यावर कारवाई तर व्हावीच; परंतु, नाहकपणे ज्या अकरा युवकांचा बळी गेला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना आयपीएल संघातील सर्व क्रिकेटपटूंनी आणि क्रिकेट कंट्रोल बोर्डाने देखील आर्थिक मदत आता द्यायला हवी, हीच किमान त्यांच्या दुःखावर फुंकर असेल! परंतु, या दुर्घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही एकही क्रिकेटपटू मदतीची घोषणा करित नाही; यावरून युवकांनी बोध घ्यावा!
COMMENTS