Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा-भीमा स्थिरीकरणात जामखेड तालुक्याचा समावेश करा

आमदार प्रा.राम शिंदे यांची राज्य सरकारकडे मागणी

जामखेड ः कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला आहे.

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा

जामखेड ः कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 19 मे 2024 रोजी पत्र लिहून मागणी केली आहे. या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून अहवाल सादर करावा असे निर्देश देताच जलसंपदा विभागाने 6 जून 2024 रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना एक पत्र लिहून जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आ. राम शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात सिंचनाची मोठी सोय  नाही. तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. तालुक्यात पाट पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी व जामखेड तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आ प्रा राम शिंदे पुढाकार घेतला आहे. आमदार शिंदे यांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कृष्णा भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने हाती घेतली आहे. या योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे मराठवाड्याला दिले जाणार आहे. सदर योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून अहवाल मागवला आहे. जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांची मागणी महायुती सरकार कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमांतून पुर्ण करेल आणि जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी मिळेल हा मला ठाम विश्‍वास आहे.
प्रा.राम शिंदे, आमदार

COMMENTS