विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध

नागपूरमध्ये आणि अकोला-वाशीम-बुलडाणामध्ये रंगणार लढत

मुंबई : विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, या जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची म

‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा
बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन
पडेगाव राहुरी रेल्वे मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

मुंबई : विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, या जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाना या विदर्भातील जागांवर लढत होणार आहे.
राज्यातील सहा पैकी बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. तर, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशीम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. धुळ्यामध्ये भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. याशिवाय, मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागलेली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. त्यानंतर शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर फडणवीस आणि पाटील यांची वरिष्ठांशी चर्चा झाली. दुसरीकडे राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं. त्यानंतर दुपारी दीड वाजता फडणवीस यांनी भाजप नेते धनंजय महाडिकांना फोन करुन भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितले. पक्षादेश आल्याने अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील यांचि बिनविरोध निवड झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणार्‍या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कोपरकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत. तिकडे धुळे-नंदुरबारमध्ये भाजपने तगडा उमेदवार दिलाय. भाजपनं अमरिश पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून नवख्या गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धनंजय महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपने काँग्रेसला कोल्हापूरची जगा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


बिनविरोध उमेदवार
कोल्हापूर काँगे्रस सतेज पाटील
धुळे-नंदूरबार भाजप अमरिश पटेल
मुंबई -भाजप राजहंस सिंग
मुंबई -शिवसेना सुनील शिंदे


नागपुरात बावनकुळे विरुद्ध भोयर लढत
भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.


अकोल्यात वंचितचे संख्याबळ ठरणार निर्णायक
अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘जॅकपॉट‘ ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना रंगणार आहे.

COMMENTS