Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा ः मंत्री दीपक केसरकर

सोलापूर : मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुद्धा टिकली पाहिजे. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. त्यांच्या पा

मिरजेतील अपघातात 5 जणांचा मृत्यू
पशु-पक्ष्यांना केली पाण्याची सोय
सोलापूरात तापमाण चाळीशी पार

सोलापूर : मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुद्धा टिकली पाहिजे. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच राहील, अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सांगोला येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. ग. दि. माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे आयोजित या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिवाजीराव काळुंगे, भाऊसाहेब रुपनर, रफिक नदाफ आदि उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी, यासाठी मराठी माणसाने लढा दिला. त्या पार्श्‍वभूमिवर मुंबईमध्ये मराठी टिकली पाहिजे. मुंबईमध्ये भव्य असे मराठी भवन व साहित्य भवन बांधणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. खंडीत झालेली ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची परंपरा शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा सुरु केली आहे, याबद्दल त्यांनी कौतुक केले. मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मराठी भाषा, मराठी साहित्य याला वेगळे करता येणार नाही. मराठी क्रांती, मराठी चित्रपटसृष्टी, मराठी गीते हा जरी साहित्याचा भाग असला तरी साहित्य आणि मराठी भाषा हे अविभाज्य नाते आहे. इंग्रजाच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी यावर्षीपासून अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून व पुढच्या वर्षीपासून वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माणदेशातील माणसे ताठ मानेने जगणारी असल्यामुळे या परिसराला माणदेश नाव पडले आहे, असे सांगत स्वागताध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, सर्वाधिक शक्ती भाषेमध्ये असून आवाजात बदल झाला तरी भाषेत बदल होतो, ही भाषेची ताकद आहे. मराठी भाषा आपल्या आई समान असून यापुढील काळात मराठी भाषा मजबूत झाली पाहिजे. मराठी भाषेची आवड प्रत्येक तरुणाला झाली पाहिजे. त्याचप्रमाणे विचाराचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी संमेलन सुरु केले आहे. सांगोल्यात एक यशस्वी साहित्य संमेलन पार पडले असून यापुढील 3 ते 4 वर्षात हे संमेलन समुद्रासारखे पसरेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS