Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला

आ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी : पावसाळ्यात पाऊस पडतो अतिवृष्टी होते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात देखील पाऊस आणि सोबतीला गारपीट होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे भविष

श्री संत जगनाडे महाराज ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत ः  आ. आशुतोष काळे
युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : पावसाळ्यात पाऊस पडतो अतिवृष्टी होते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात देखील पाऊस आणि सोबतीला गारपीट होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असते. मात्र विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे पिक विमा भरूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी पिक विम्याचे निकष बदला अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील तीन  चार वर्षापासून पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व वेळेवर पाऊस न पडल्यामुळे होणार्‍या नुकसानीच्या भीतीपोटी असंख्य शेतकरी पिक विमा भरतात. मात्र शेतकर्‍यांचे नुकसान होवून देखील अनेक नुकसानग्रस्त शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत असून विमा कंपनीचे निकष व जाचक अटी यासाठी कारणीभूत आहेत. शेतकर्‍यांचे 100 टक्के जरी नुकसान झाले तरी विमा कंपनीकडून हे नुकसान 50 टक्केच ग्राह्य धरले जाते व विमा कंपनीकडून नुकसानीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत फोन कॉलच्या माध्यमातून विमा कंपनीला द्यावी लागते. परंतु झालेल्या नुकसानीतून शेतकर्‍यांना सावरायला वेळ जातो. नुकसान झाल्यामुळे राज्यातून हजारो कॉल विमा कंपनीला करण्यात येत असल्यामुळे विमा कंपनीचा फोन कायम व्यस्त असतो. लहरी हवामानामुळे कधी पाऊस पडेल हे काही सांगता येत नाही. पावसाळ्यात तर पाऊस पडतोच मात्र हिवाळा व उन्हाळा या ऋतूत देखील पाऊस पडत असून सोबतीला गारपीट होत आहे. पिक विमा घेणार्‍या सर्वच नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात का याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यात जे निकष अडचणीचे आहेत अशा निकषांमध्ये बदल करावा.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ मिळेल. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल व जास्तीत जास्त शेतकरी पिक विमा घेतील यासाठी पिक विम्याच्या निकषात बदल करून शेतकर्‍यांना सावरण्यास मदत करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

जर शासनाला विमा कंपनीच्या निकषात बदल करण्यात अडचणी येत असतील तर शासनाच्या वाट्याची पिक विम्याची जी रक्कम शासन विमा कंपनीकडे जमा करते ती रक्कम व शेतकर्‍यांची पिक विम्याची भरलेली रक्कम एकत्र करून शासनाने ती रक्कम नुकसानग्रस्त शेकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल व विमा कंपनीकडे शेतकर्‍यांना हात देखील पसरावे लागणार नाही. – आ. आशुतोष काळे.

COMMENTS