Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावण्यासाठी भूमिपुत्र एकवटले !

किरण जगताप/कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यमान आश रोहित पवार यांच्यावर सध्या मोठ्या राजकीय टीकेचा भडिमार होत आहे. पाच वर्षांच्या त्यांच्या

सात वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा लावला शोध… | DAINIK LOKMNTHAN
मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले |
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

किरण जगताप/कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यमान आश रोहित पवार यांच्यावर सध्या मोठ्या राजकीय टीकेचा भडिमार होत आहे. पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना बाजूला ठेवून केवळ स्वतःची प्रतिमा उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात येत आहे. एकूणच रोहित पवार हे एकाधिकारशाहीने वागत असल्याचा मुख्य आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
रोहित पवार हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पवार घराण्यातील सदस्य असल्यामुळे त्यांचे स्थानिक आणि राज्यस्तरावरील राजकारणात एक वेगळे महत्त्व आहे. मात्र, स्थानिक स्तरावरील नेते, विशेषतः ज्यांनी रोहित पवार यांना निवडून आणण्यात मोठे योगदान दिले त्यांनाच बाजूला ठेवून पवार यांनी स्वीय सहाय्यकांच्या माध्यमातून मतदारसंघ चालवण्याचा निर्णय घेतला. प्रमुख नेत्यांना विश्‍वासात घेऊन काम केले नाही. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यातच, पवार यांच्या फलकांवर केवळ स्वतःचेच फोटो झळकणे आणि स्थानिक नेत्यांना बाहेर ठेवणे, या गोष्टींनी परिस्थिती अधिकच बिघडवली. या विरोधाचा केंद्रबिंदू स्थानिक नेत्यांचा असंतोष आहे. या नेत्यांनी पाच वर्षांत झालेल्या घटनांचा आढावा घेतला आणि आ. रोहित पवार यांच्याविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वाला विरोध करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी इतर पक्षात प्रवेश केलेला आहे. काही स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. कर्जत- जामखेडचा आमदार हा भूमिपुत्र असावा ही भूमिका मांडून ते जनतेसमोर जात आहेत. मतदारसंघात रोहित पवारांविषयी प्रचंड नाराजी असल्याचे नागरिकांचे अनुभव समोर आणले जात आहेत. गाव भेट दौर्‍यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून पवार यांच्याविरुद्धची नाराजी ही केवळ नेत्यांपुरती मर्यादित नसून ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली असल्याचे ते सांगत आहेत. या सगळ्या घडामोडींना रोहित पवार यांनीही गांभीर्याने घेतले आहे. ’सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे’, असे आ. रोहित पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, या विधानावरून मतदारसंघातील परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे असे मानणे धाडसाचे ठरेल. राजकीय समीकरणे सतत बदलत असतात आणि ही जनता खरच त्यांच्यासोबत कितपत आहे, हे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. सध्या रोहित पवार यांना पराभूत करण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. विशेषतः स्थानिक भूमिपुत्र नेत्यांनी एकत्र येऊन जर एकच उमेदवार दिला, तर रोहित पवार यांना कडवी लढत द्यावी लागेल. तसे झाले तर पवार यांच्यासमोर राजकीय आव्हान निर्माण होऊ शकते. रोहित पवार यांचे मतदारसंघातील नेतृत्व टिकवणे, हे त्यांच्या सध्या चाललेल्या विरोधी वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर अवघड होऊ शकते. मात्र, पवार यांची रणनीती आणि त्यांची जनतेशी असलेली नाळ कितपत रुजलेली आहे, त्यावर येत्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

COMMENTS