Homeताज्या बातम्यासंपादकीय

बेभान अवलादी अन्……..

आयटी संस्कृतीने देशाच्या महानगरांचा चेहरा मोहराचा बदलून टाकला आहे! अत्याधुनिक इमारती, जगभरातलं आऊटसोर्सिंग, त्या अनुषंगाने उच्च वेतन, त्यातून निर

सीएम केअर फंडाचा अभिमानच! पीएम केअर चे काय…?
ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 
रहबर ते रेडिओ ! 

आयटी संस्कृतीने देशाच्या महानगरांचा चेहरा मोहराचा बदलून टाकला आहे! अत्याधुनिक इमारती, जगभरातलं आऊटसोर्सिंग, त्या अनुषंगाने उच्च वेतन, त्यातून निर्माण झालेली जीवनशैली आणि त्या जीवनशैलीला पूरक असणाऱ्या बाजारपेठीय सर्व सुविधा, या महानगरांमध्ये उपलब्ध असतात! आयटी क्षेत्रामधल्या इंजिनियर्स आणि तरुणाईला तीन शिफ्ट मध्ये काम असल्यामुळे, रात्री, पहाटे, दिवसा कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करताना वेळी-अवेळी वावरणे, या बाबी घडत असतात. जन्मगाव, जवळची नाते-गोते सोडून, तणाव मनामध्ये निर्माण होतात, यातून  विरंगुळा हा एक प्रकार मनोरंजनाचा म्हणा किंवा त्यांच्या काही क्षणासाठी मनशांती‌ मिळविण्यासाठी म्हणा, नवीन पब संस्कृती देखील जन्माला आली. मनशांतीसाठी माणसं अध्यात्माकडे जात होती. परंतु, सैरभैर झालेल्या मनाला काही क्षणांचा विरंगुळा म्हणून आणि तिलाच शांतता संबोधून तरुण पिढी आपली जीवनशैली जगत असते. अतिशय धकाधकीच्या या जीवन पद्धतीत त्यांच्या जीवनाचा नेमका सफर कसा राहील, हे त्यांनाही ठाऊक नसते आणि त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना हकनाक किंवा विनाकारण एखाद्या घटनेत बळी जावे लागते. तशीच घटना काल पुणे या आयटी हब असणाऱ्या महानगरात घडली. एका श्रीमंत बापाचा बिघडलेला पोरगा  संपत्तीच्या ढिगार्‍यात वावरत असताना, त्याला सत्ता-मत्ता-धन या सगळ्या बाबी, त्याच्या जवळ असताना, त्याला जगाची परवा का वाटावी? त्यातूनच त्याचा बेदरकारपणा निर्माण झाला. नशेच्या धुंदीत तेवढीच बेभान, अति महागडी कार चालवणारा,  श्रीमंत बापाचा मुलगा तरुणताठ्या दोन अभियंत्यना एखाद्या फुटबॉलला किक मारावी आणि तो फुटबॉल हवेत उंचावत गटांगळ्या खात एका बाजूला जाऊन पडावा; अगदी फुटबॉलच्या मैदानात दिसणारं दृश्य जस आपण पाहतो, तसंच पुण्यातील त्या तरुण अभियंता आणि अभियत्री संदर्भात घडलं.

पुणे हे आयटी हब असल्यामुळे रात्र हा देखील त्या ठिकाणी दिवस वाटायला लागतो. रिक्षांच्या रांगा, हॉटेल आणि पब संस्कृतीचं २४ तास जागणं. त्याच अनुषंगाने तीन शिफ्ट मध्ये काम करणारी आयटी तरुणाई. रात्री- अपरात्री रस्त्यावर असणं, या सगळ्या बाबी नेहमीच्या झाल्या. परंतु रुटीन असणाऱ्या बाबींमध्ये सत्ता आणि श्रीमंती याचा माज असणाऱ्या काही श्रीमंत बापांच्या अवलादी, आपली गाडी घेऊन जेव्हा बेभान बाहेर पडतात, तेव्हा शांतपणे चालणारी आयटी संस्कृतीलाही धक्का लागतो. अनपेक्षितपणे कुणाचा तरी बळी जातो. हा बळी जाणं म्हणजे केवळ अपघात नव्हे तर ती, एक प्रकारे नव श्रीमंत बापांच्या बिघडलेल्या अवलादांची संस्कृती आहे. ही संस्कृती मानवतेच्या विरोधातील संस्कृती आहे. अशा या बेभान श्रीमंताच्या अवलादीला त्याचं वय किती आहे, याबाबत संभ्रमित करून, त्याला पोलीस खात्याने अल्पवयीन आधीच घोषित केले. त्यामुळे त्याच्यावर गंभीर  गुन्ह्यांची नोंदणी ही झालीच नाही. त्याच्या वयाच्या संदर्भातला पुरावा अद्यापही कोणी मागितलेला नाही. याचाच अर्थ प्रत्येक संस्था किंवा व्यक्ती त्या श्रीमंताला  वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुष्याची स्वप्न पहात आपलं जन्मगाव सोडून नोकरीच्या गावी दाखल झालेली अश्विनी आणि अनिस या तरुण-तरुणीचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, ते दृश्यच सर्वसामान्य माणसाला विचलित करणारे आहे. भर रस्त्यावरून गाडीचा कमालतम जो वेग असेल, ती वेग मर्यादा लक्षात न घेता बेभान सुटलेला वेदांत अग्रवाल याने पुण्यामध्ये घडवलेला अपघात एक प्रकारचा सदोष मनुष्यवध आहे. त्याला कोणत्या मर्यादेत गाडी चालवावी, याचे देखील भान राहिले नाही. ज्या रस्त्यावर माणसं चालत आहेत, तो त्या रस्त्यावर एखाद्या जंगलात प्रचंड वेगाने गाडी घुसवावी, तशा पद्धतीने तो महानगराच्या रस्त्यांवर गाडी पळवत होता. परंतु, त्यापेक्षाही भयावह बाब म्हणजे पोलिसांनी त्याला जी शिक्षा अल्पवयीन म्हणून दिली; ती म्हणजे केवळ निबंध लिहून देणे आणि पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करणे, ही बाब तर त्याहीपेक्षा चीड आणणारी आहे. जे पोलीस श्रीमंताच्या मुलासाठी  तत्परता दाखवतात, अवघ्या पंधरा तासात त्याला घरी सोडतात आणि त्यानंतर त्याला जी शिक्षा देतात, ती शिक्षा ऐकूनच सर्वसामान्याला  गुन्हा आणि त्या गुन्हेच्या अनुषंगाने जो न्याय करायचा असतो, ते न्याय तत्व पोलिसांनी केव्हाच बाजूला ठेवले आहे. अर्थात न्यायाशी त्यांचा संबंध तसाही असत नाही! परंतु, न्याय यंत्रणा म्हणून पोलिसांनी काम करणे हे कितपत योग्य आहे?

COMMENTS