Homeताज्या बातम्यासंपादकीय

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार ओबीसी !

 महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड करून, मोदी यांनी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत; सर्वात महत्त्

महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा
नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज ; जागरूक नागरिक मंचाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

 महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड करून, मोदी यांनी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत; सर्वात महत्त्वाचे म्हणजे दक्षिण भारताला राष्ट्रीय नेतृत्व स्थानी आणणं. अर्थात यापूर्वी असे नेतृत्व एम. वेंकय्या नायडू यांच्या रूपाने दिले गेले होते. ते उपराष्ट्रपती होते. मात्र आंध्र प्रदेशाच्या होते. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूमधील कोंगू वेंगलार या समाजाचे आहेत. हा समाज १९७५ पर्यंत तमिळनाडूतील उच्च जात प्रवर्ग म्हणून ओळखला जात होता. परंतु १९७५ मध्ये या समुदायाला ओबीसीचा दर्जा मिळाला. उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी उमेदवार आणि तोही दक्षिण भारतीय आणि त्यातही ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अद्यापही यश मिळत नाही असं राज्य, म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये सांस्कृतिक संघर्ष अतिशय टोकाचा आहे, त्या राज्याला प्रतिनिधित्व देऊन काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडू भाजपमधील दिग्गज नेते राहिले आहेत. त्यांनी पश्चिम विभागातील कोईम्बतूर, तिरुपूर आणि इरोड जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. ते संसदीय नियम आणि कार्यपद्धती यांमध्ये पारंगत असून त्यांनी दोनदा लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. जेपी नड्डा यांनी सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यामागे, मोदी यांची निवडच यामध्ये स्पष्टपणे दिसते. अर्थात, सीपी राधाकृष्णन हे समन्वयाचे उमेदवार यासाठी होऊ शकले की, एका बाजूला त्यांचा राजकीय प्रवास भाजपातून आरएसएस मध्ये गेला. आरएसएस मध्ये ही त्यांना मोठ्या प्रमाणात मान्यता आहे. दुसऱ्या बाजूला ते तामिळनाडू मधून दोन वेळा खासदार झाले आहेत. एकदा एआयडिएमके बरोबर भाजपची युती असताना आणि दुसऱ्यांदा डीएमके बरोबर भाजपची युती असताना, त्यांनी या संधीचा फायदा घेतला होता! ते लोकसभेवर निवडून गेले होते. याही वेळी विरोधी पक्षांच्या समोर एक आव्हान उभे राहिले आहे. कारण दक्षिण भारतातील उमेदवार निवडताना तो ओबीसी समकक्ष उमेदवार निवडण्याची एक प्रकारे त्यांच्यावर सक्ती होईल. यासाठी काँग्रेस अंतर्गत शशी थरूर यांचे नाव चालवले जात असले, तरी शशी थरूर यांना बहुतांश पक्षाची मान्यता नाही. कारण शशी थरूर यांचं जे मिजाजी व्यक्तिमत्व आहे ते कोणत्याही पक्षाला फारसे रुचणार नाही. अर्थात, विरोधी पक्षांचा म्हणजे इंडिया ब्लॉकचा उमेदवार ठरण्यापूर्वीच महाराष्ट्रातून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता असावी, अशा प्रकारचे सुतोवाच खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेतून दिसते. त्यांनी सीपी राधाकृष्णन यांना कोणताही विरोधाभास नसलेले व्यक्तिमत्व आणि राजकारणाची जाण असलेलं आणि कोणतीही कांट्रोवर्सी न करणारे व्यक्तिमत्व म्हणून गौरवले आहे. याचा अर्थ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवण्यात कदाचित एनडीए आघाडीला यश मिळाले आहे, असा याचा अर्थ होतो. तरीही, इंडिया ब्लॉक एकत्र राहण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे समजा इंडिया ब्लॉकने उमेदवार ठरवलाच, तर त्या उमेदवाराला पाठिंबा देणं ही इंडिया ब्लॉकची जबाबदारी राहील. अर्थात, तुम्ही वाचक म्हणून हे सदर वाचत असाल तोपर्यंत इंडिया ब्लाॅकचा उमेदवार ठरलेला असेल. तरीही, यामध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या सहजासहजी मान्य करतील, असं दिसत नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ही संजय राऊत यांच्या माध्यमातून व्यक्त केलेली प्रतिक्रिया देखील बोलकी आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चुरस होईल अशा पद्धतीने उमेदवार ठरवला जाणार नाही. एक तळागाळातील नेता जो नेहमी जमिनीवर पाय ठेवतो, सीपी राधाकृष्णन हे अटलबिहारी वाजपेयी आणि एलके अडवाणी काळातील नेते आहेत. १९९८ आणि १९९९ मध्ये कोईम्बतूरमधून खासदार म्हणून निवडून आले, जेव्हा भाजपने एआयडिएमके आणि डीएमके सोबत युती केली होती. १९९८ मध्ये त्यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे दीड लाखापेक्षा अधिक मतांनी जागा जिंकली होती. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर राहून राधाकृष्णन यांना ही संधी मिळत आहे.

COMMENTS