वंचितचे नेते अॅड. आंबेडकरांकडून दाखल याचिकेवर निर्देशमुंबई : महाराष्ट्रात नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालावर अनेक राजकीय न
वंचितचे नेते अॅड. आंबेडकरांकडून दाखल याचिकेवर निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालावर अनेक राजकीय नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, यात प्रमुख मुद्दा म्हणजे साडेपाचनंतर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली असून, यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आलेली आहे. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली. सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ देण्याचे आदेश या नोटीसमध्ये दिले आहे. तसेच या नोटीसीला 2 आठवड्यात उत्तर द्यावे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे समोर आले होते, त्यामुळे साडेपाच वाजता जी मतदानाची टक्केवारी देण्यात आली होती, ती आणि त्यानंतर झालेल्या मतदानात मोठा बदल दिसून येत होता, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडीओ क्लीप द्या, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकार्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
COMMENTS