Homeताज्या बातम्यासंपादकीय

सुमार दर्जाचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या लायकीचा कसा ?

ऑस्कर हे चित्रपट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा  पुरस्कार; मात्र, या पुरस्काराला आजपर्यंत भारतातला फक्त एकच चित्रपट स्पर्श करू शकला; तो म्हणजे 'स

अदानी स्पष्टीकरण का देता हेत ? 
सामाजिक ध्रुवीकरणाकडून धार्मिक ध्रुवीकरणाकडे ?
लोकशाही सशक्त करावयाची असेल, तर…….!

ऑस्कर हे चित्रपट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा  पुरस्कार; मात्र, या पुरस्काराला आजपर्यंत भारतातला फक्त एकच चित्रपट स्पर्श करू शकला; तो म्हणजे ‘स्लम डॉग मिलेनियर,’! अर्थात, या चित्रपटाची निर्मिती ही बाहेरच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी केली होती. त्याला  अनेक ऑस्कर मिळाले. भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांनाही संगीताचा ऑस्कर मिळाला होता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून भारताकडे एक बाजारपेठ म्हणून पाहत असताना, ऑस्करच्या माध्यमातूनही भारतातला प्रेक्षक वर्ग लक्षात घेऊन, काही बाबी आता करण्यात येत आहेत. शुद्ध भारतीय बनावटीचे चित्रपट ऑस्कर पासून अजूनही लांब आहेत. सध्या, लापता लेडीज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला गेलेला हा चित्रपट ऑस्कर साठी नामनिर्देशित करण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा चित्रपट क्षेत्रातील प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. खरे तर, हा चित्रपट अतिशय सुमार दर्जाच्या दृश्यांमधून पुढे जात, कथानक आपल्या माथी मारत असतो. स्त्री स्वातंत्र्य या नावाखाली हा चित्रपट आपल्याला कथानकातून पुढे नेत असतो. मध्येच, एका स्टेशनवर त्या नववधूंची अदलाबदल होते आणि त्यातील असणारी एक नववधू ही विवाहितही नाही; परंतु, ती शिक्षणासाठी स्वतःला इतर कुटुंबाकडे सोपवून देते. यावरून स्त्री स्वातंत्र्यवर आधारलेला हा चित्रपट आहे; अशी चर्चा माध्यम करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात हा चित्रपट जो संदेश देतो, तो, म्हणजे जैविक शेतीचा! भारतात लोकसंख्या जर पाहिली तर १४० कोटीच्या लोकसंख्येला अन्नपुरवठा करण्यासाठी जी हरितक्रांती पंजाब आणि हरियाणा मधून झाली; त्या हरितक्रांतीमुळे हा देश अन्नधान्यात स्वावलंबी झाला. 

करोडो लोकांच्या पोटात असणारी भूक भागविणारे अन्न, या देशातच निर्माण होऊ लागले. प्रसंगी, हरितक्रांतीने निर्माण केलेले अन्नधान्य आपण काही देशांना निर्यातही करू लागलो. परंतु, मध्येच जैविक शेतीचा नाद करणारे काही खोडसाळ कृषी विचारवंत पुढे आलेत.  त्यांनी जैविक शेतीच्या नावावर पुन्हा त्या दिशेने समाजाला आणि शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. जैविक शेतीच्या माध्यमातून देशाची अवस्था काय होते, हे आपण नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या आर्थिक उध्वस्तकरणातही पाहिलं. श्रीलंकेतही अशाच प्रकारे जैविक शेतीचा आग्रह करणारे अनेक सत्ताधारी निश्चितपणे होते.  त्यातून श्रीलंकेचं अन्नधान्यातलं स्वावलंबन संपुष्टात आलं.  त्याचा अर्थव्यवस्थेवर ही एवढा परिणाम झाला की, आज त्या देशाची सूत्र थेट कम्युनिस्ट पक्षांच्या हातात आले. भारतात जास्तीत जास्त लोकांची भूक भागवण्यासाठी हरितक्रांती हेच उपयोगी ठरले. परंतु, आजही भारतातील निम्मी जनता ही अर्धपोटी किंवा एक वेळ उपाशी असते. ही आकडेवारी आहे. अशा काळात अन्नधान्याचा पुरवठा त्यांच्यापर्यंत होणं, हे गरजेचं असताना जैविक शेतीचा जो प्रयोग केला जातो आहे आणि त्याचा प्रचार चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा जो प्रयत्न सध्या चालवला आहे, त्याचं प्रतिनिधित्व ‘लापता लेडीज’ हा ओटीपी प्लॅटफॉर्म वरचा चित्रपट करतो. अप्रत्यक्षरीत्या हा चित्रपट भारतीय समाजाला भुकेच्या दिशेने नेऊ पाहतो आहे काय? असा प्रश्न उभा राहतो. निर्माता आणि दिग्दर्शक यांना चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही मेसेज स्पष्टपणे देता आलेला नाही. ना धड स्त्री स्वातंत्र्याचा, ना धड जैविक शेतीचा! या विषयांची मिलावट करून, हा विषय हाताळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, प्रेक्षकांना त्याच्यातला अर्थबोध नेमका झाला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेला हा चित्रपट उत्तमच असेल, असं समीकरण ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न होतो. कारण, मुख्य चित्रपट क्षेत्रापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक उत्तम दर्जाचे चित्रपट दिले जातात, असा समज पसरवला जात आहे; अर्थात, त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असलं तरी, या तथ्याचा आधार घेऊन सुमार दर्जाचे विषय जागतिक पातळीवर पोहोचवणं हे एक प्रकारे भारतीयांना प्रेक्षक म्हणून मूर्ख समजण्याचं धारिष्ट आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे धड कोणताही संदेश न देऊ शकलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करच्या दर्जाचा आहे, असं वाटणं यामध्ये या चित्रपटाच्या अनुषंगाने जुळलेल्यांचं आर्थिक गणित निश्चित काही असेल, परंतु, हा चित्रपट निश्चितपणे सुमार दर्जाचा आहे, यात मात्र आम्हाला कोणती शंका वाटत नाही!

COMMENTS